सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात कुणाला ही यश येणार नाही : शरद पवार

गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंहांनी 100 कोटी वसूलीचे आरोप गंभीर असून त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, या प्रकरणी उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यांनी हे देखील सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीचे सर्वाधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असेल.
परमबीर सिंह यांच्याशी माझी भेट झाली होती असे पवारांनी सुरुवातील स्पष्ट केले. परमबीर सिंह यांनी आयुक्त पदावर असताना आरोप केले नसून यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली केल्यानंतर गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत असे शरद पवारांनी सांगिले. गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंहांनी 100 कोटी वसूलीचे आरोप हे गंभीर आहेत पण, त्या पत्रावर परमबीर सिंह यांचे हस्ताक्षर नाही असेही ते म्हणाले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना चौकशीचे सर्वाधिकार आहेत, त्यांनी योग्य ती चौकशी करावी असे पवारांनी सांगितले. तसेच, गृहमंत्र्यांनी मागणी केलेले हे 100 कोटी रुपये नेमके कोणाला द्यायचे, कुणाकडे गेले ते या पत्रात नमूद केले नाही. वाझे यांना सेवेत परत घ्यायचा निर्णय हा परमबीर सिंह यांचाच होता. वाझेंच्या नियुक्तीचा निर्णय हा गृहमंत्र्यांचा नव्हता. मनसुख यांची गाडी वाझे यांनी घेतली होती आणि त्यात त्यानी स्फोटके ठेवली. या प्रकरणी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून चौकशीचे सर्वाधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असेल. मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा असे शरद पवार यांनी सांगितले. फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर ‘हे’ पत्र समोर आल्याचे वक्तव्य यावेळी शरद पवार यांनी केले. राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असून यामध्ये कुणालाही यश येणार नाही असेही शरद पवार म्हणाले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. रोज काही ना काही नवीन बाहेर येत आहे. पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी 20 मार्चला मुख्यमंत्र्याना एक पत्र लिहले आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना महिन्याला 100 कोटी रुपयांचा फंड गोळा करण्याचे निर्देश दिल्याचा खळबळजनक आरोप केला.