MaharashtraNewsUpdate : …तर लागू शकतो लॉकडाऊन, सावधान !! महाराष्ट्रात पुन्हा पसरतोय कोरोना

मुंबई । राज्यात सर्वत्र लसीकरणाची मोहीम सुरु असताना दरम्यानच्या काळात काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याच्या सुखद बातम्या येत असताना आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य सरकार गंभीर झाले असून नागरिकांनी कोरोना नियमांचे प्लॅन केले नाही तर लॉकडाऊन लागू शकतो असा निर्वाणीचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील सर्वाधित प्रभावित राज्य ठरताना दिसत आहे. ताज्या माहितीनुसार राज्यात 3 हजार 365 नवे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे राज्याने केरळला मागे सोडले आहे. केरळमध्ये सोमवारी 2 हजार 884 कोरोना रूग्ण आढळले होते. राज्यात नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाचे इतके जास्त रूग्ण आढळले आहेत.
काल औरंगाबाद शहरात या बाबत पत्रकारांसोबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते, की रुग्णसंख्या सलग वाढत राहिल्यास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कठोर पाऊलं उचलावी लागतील. सोमवारी राज्यात कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 67 हजार 643 वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत तब्बल 51 हजार 552 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून राज्यात रोज 3 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत.
दरम्यान कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेने धारावीतील काही क्षेत्रात मोबाईल टेस्टिंग व्हॅन तैनात केली आहे. धारावी, दादर आणि माहीम परिसरात आठवडाभरात कोरोना रुगणांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली असल्यानं पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. नुकतंच राज्य सरकारने केरळवरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक आहे.
सोमवारी देशात 9 हजार 93 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागच्या दोन सोमवारची यासोबत तुलना केल्यास संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी रूग्णसंख्या कमी येण्याचे कारण म्हणजे वीकेंडमुळे स्टाफ कमी असल्याने चाचण्याही कमी झाल्या होत्या. सोमवारी 4.9 लाखापेक्षाही कमी चाचण्या झाल्या. 6 महिन्यात इतक्या कमी चाचण्या होण्याची ही पहिलीच वेळ होती. सोमवारी देशात 82 रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर आतापर्यंत मृतांचा आकडा 1 लाख 55 हजार 844 च्या पार गेला आहे.