EducationNewsUpdate : शालेय शिक्षण मंत्र्यांनी केली मोठी घोषणा , १० वी , १२ वी च्या परीक्षा जाहीर

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
दरम्यान आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या प्रचलित कालावधीमध्ये परीक्षा आयोजित न करता शासन मान्यतेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या वेळापत्रक बदलण्यात आले आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फतआधी दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ आणि बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २९ मे २०२१ या काळात होणार होती. सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तसेच बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे.
नव्या वेळापत्रकात बारावीच्या परीक्षेचा कालावधी आठ दिवसांनी कमी केला तर दहावीच्या परीक्षेचा कालावधी ११ दिवसांनी कमी केला आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल जुलै महिना संपण्याआधी आणि दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी जाहीर केला जाईल. तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठी एप्रिल-मे 2021 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकाही जाहीर करण्यात आले.
कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. राज्यात इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून, 18 जानेवारी 2021 रोजी 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत आणि 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिली होती.