शेतकऱ्यांच्या उद्रेक, असंतोषाचा भडका उडू नये म्हणून… अखेर मोदींनी घेतले मनावर !!

दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७१ दिवस उलटल्यानंतर उद्रेकाची आणि असंतोषाची दखल घेऊन अखेर आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासहीत अनेक मंत्र्यांसोबत एक तातडीची बैठक घेतली असल्याचे वृत्त आहे .
दरम्यान शेतकरी आंदोलनाशी निगडीत ‘मोदी प्लानिंग फार्मर जेनोसाईड’ या हॅशटॅगसहीत करण्यात आलेला सर्व मजकूर ट्विटरवरून लवकरात लवकर हटवण्यात यावा, असे आदेश केंद्राकडून ‘ट्विटर’ला जारी करण्यात आले आहेत. याद्वारे सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच द्वेष आणि खोटी माहिती पसरवण्यात आल्याचे ही सरकारने म्हटले आहे.
दुसरीकडे पोलिसांकडून शेतकऱ्यांना अडवण्याचे कितीही प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असले तरी गाझीपूर सीमेवर पुन्हा एकदा मोठ्या संख्येत शेतकरी एकवटलेले पाहून पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सध्या या भागात पोलिसांनी कलम १४४ लागू केले असून मोबाईल नेट्वर्करची सेवाही सस्पेंड केली आहे. तरीही शेतकरी दिल्लीच्या सीमाभागात गर्दी करीत आहेत. हरयाणा सरकारकडून सात जिल्ह्यांतील मोबाईल, इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हरयाणात कॅथल, पानीपत, जिंद, रोहतक, चरखी दादरी, सोनीपत आणि झज्जर या भागांत मोबाईल इंटरनेट (टूजी, थ्री जी, फोर जी, सीडीएमए, जीपीआरए) तसंच मोबाईल नेटवर्कवर उपलब्ध असलेली डोंगल सेवाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
भारत किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आज हरयाणातील जिंद जिल्ह्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या महापंचायतीत सहभागी होत आहेत. जिंदच्या कंडेला गावात या महापंचायतीची तयारी करण्यात आली आहे. – गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या राकेश टिकैत यांनी सरकारची चिंता वाढवली आहे. हे ‘आंदोलन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. त्यानंतर पुढची तारीख दिली जाईल’ असं राकेश टिकैत यांनी मंगळवारी म्हटले होते. दरम्यान मंगळवारी, पोलिसांनी रस्त्यावर घातलेल्या बॅरिकेडसच्या बाजुला रस्त्यावर बसून राकेश टिकैत यांनी जेवण घेतले होते. मंगळवारी सायंकाळी संयुक्त किसान मोर्चाच्या एका प्रतिनिधिमंडळाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती.