देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीला यश, अण्णा हजारेंचे उपोषण मागे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी म्हणजेच उद्यापासून उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आज त्यांनी उपोषण मागे घेण्याचे ठरवले आहे. केंद्र सरकार उच्चाधिकार समिती स्थापन करणार, या प्रस्तावावर अण्णा समाधानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णांची उद्या पासूनचे उपोषण आंदोलन रद्द केल्याची घोषणा केली आहे.
हजारे येत्या ३० जानेवारीपासून आपल्या राळेगणसिद्धी गावात विविध कृषी मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणार होते. हे उपोषण केंद्र सरकार विरोधात होते. त्याचपार्श्वभूमीवर फडणवीस यांनी अण्णा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले कि, “आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, अण्णा हजारे यांनी 30 तारखेपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने त्यांचा आग्रह होता. मागच्या काळात ज्यावेळी उपोषणाला बसले होते त्यावेळी त्यांना दिलेला आश्वासनांची बऱ्यापैकी पूर्तता झाली आहे. विशेष: त्याच्या आग्रहाखातर केंद्र सरकारने कोल्ड स्टोरेज आणि इतर कामांसाठी ६ हजार कोटी दिला, त्यांना दिलेल्या आश्वासनानंतरच केंद्र सरकारने किसान सन्मान निधी सुरु केला, जीएसटी कमी केला, असे अनेक मुद्दे त्यावेळी घेण्यात आले. काही अजून मुलभूत मुद्दे ज्या मुद्द्यांसंदर्भात त्यावेळी सूचित करण्यात आले होते की, उच्चस्तरीय समिती गठीत करुन त्यामाध्यमातून निर्णय घेतला जाईल. दुर्देवाने निवडणूक आणि कोरोनामुळे घेता आला नाही. पण आता समिती गठीत करुन सहा महिन्यात निर्णय होईल”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, अन्न हजारे म्हणाले कि, “अनेक वर्ष समाज, राष्ट्रहितासाठी आंदोलन करत आलो, हा घटनेने दिलेला अधिकार आहे, अन्याय आणि अत्याचार होत असेल तर शांततेत अहिंसेच्या मार्गाने लढा द्यायचा. स्वामिनाथन आयोगचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला आहे. जो खर्च आहे त्यापेक्षाव पन्नास टक्के उत्पन्न वाढवून द्या, असे त्यात म्हटले होते. त्याबाबत सरकारने आश्वासन दिले होते. पण आश्वासनांची पूर्तता झाली नव्हती. आता सरकारने आश्वासनांची पूर्तता करण्याचे पुन्हा आश्वासन दिले आहे. देवेंद्र फडणवीस त्यांचा निरोप घेऊन आले आहेत. आम्ही 15 मुद्दे दिले होते. ते मुद्दे मान्य झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा होईल. फडणवीस यांनी सांगतलेल्या निरोपावर विश्वास ठेवून मी माझा आंदोलनाचा निर्णय मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.