IndiaCrimeUpdate : काय कामाचे हे शिक्षण ? प्राचार्य –उपप्राचार्य माता-पित्यांनी अंधश्रद्धेच्या नादात स्वतःच्या मुलींवर केले हे अघोरी कृत्य !!

ही घटना आहे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातली. अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर बसलेल्या उच्चशिक्षित आई-बापाने आपल्या पोटच्या दोन मुलींची त्रिशुलाने हत्या केली. कलियुग सत्ययुगात बदलणार असून, दैवी शक्तीने मुली काही तासांतच पुन्हा जिवंत होतील, असे त्यांना वाटले. दोघेही आरोपी उच्चशिक्षित आहेत. तरीही त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापाने रविवारी रात्री आपल्या दोन्ही मुलींची हत्या केल्यानंतर स्वतःच आपल्या एका सहकाऱ्याला फोन करून त्याबाबत माहिती दिली होती. घटनेबाबत ऐकून मोठा धक्का बसलेल्या सहकाऱ्याने लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले तेंव्हा हे आई-बाप दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले.
मदनपल्लीचे डीएसपी रवि मनोहरचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या आईने दोघांची हत्या केली अशी माहिती मिळाली. एका मुलीची हत्या करण्याआधी तिचे मुंडन करण्यात आले होते. मुलींचा बाप हे सगळे बघत होता. तर आईनेच त्यांची हत्या केली. लहान मुलीला आधी त्रिशुलाने मारले. त्यानंतर मोठ्या मुलीची हत्या करण्यात आली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मुलींची हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या करणार होते. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचले.
विशेष म्हणजे व्ही. पुरुषोत्तम नायडू हा मदनपल्ली येथील सरकारी कॉलेजमध्ये उप प्राचार्य तर आई एका स्थानिक हायस्कूलमध्ये प्राचार्य आहे. त्यांची २७ वर्षीय मुलगी एलिकख्या भोपाळमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होती. तर दुसरी मुलगी दिव्या ही नोकरी करत होती. कोरोना काळात लॉकडाउनमध्ये दोन्ही मुली घरीच आपल्या आईवडिलांसोबत राहत होत्या.
म्हणे “त्या” पुन्हा जिवंत होतील…
पोलिसांना मारेकरी मात्यापित्याने सांगितले की, ‘एक दिवस वाट पाहा. त्यांच्या मुली पुन्हा जिवंत होतील. कलियुग सत्ययुगात बदलत आहे. मुली पुन्हा जिवंत होतील, असे वाटले.’ दरम्यान, दोघेही सुशिक्षित आहेत. तरीही त्यांनी हे पाऊल का उचलले, याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू केली आहे.