विजबील वसूली विरोधात एमआयएमचे महावितरणसमोर धरणे आंदोलन

औरंगाबाद : महावितरणच्या वतीने थकीत विज ग्राहकांची वसूली सुरु करण्यात आली असून विजबील वसुली विरोधात एमआयएम आक्रमक झाली आहे. एमआयएमच्या वतीने सोमवारी (दि.२६) महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. सय्यद इम्तियाज जलील यांनी सहभाग घेतला होता.
लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद होते तरीही अव्वाचे सव्व विजबील सामान्य नागरिकांना देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळातील वीजबीलमाफी करण्याची घोषणा महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केली. विजबील वसूलीच्या विरोधात एमआयएम आक्रमक झाली आहे. थकीत वीजबिल वसूली थांबवण्यात यावी. लॉकडाऊनच्या काळातील विजबील कमी करावे. या मागणीसाठी खा.इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांच्या नेतृत्वाखाली महाविरणच्या मुख्य कार्यालयासमोर बेधडक धरणे आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या अधिका-यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी नासेर सिद्दीकी, शेख अहेमद, जमीर अहेमद कादरी, विकास एडके, अरुण बोर्डे, हाजी इसाक खान, जगन्नाथ उगले, काकसाहेब काकडे, फेरोज खान, अबुल हसन हाशमी, रफत यारखान, मुनशी पटेल, वाजिद जागिरदार, अब्दुल अजिम इन्कलाब, जिशान देशमुख, आवेज दुर्रानी आदी उपस्थित होते.
माझ्या कार्यालयावर उचलून आणा
ग्रामीण भागातील ४२ लाख ग्राहकांचे २०१५ ते २०२० पर्यंत ४५ हजार कोटी थकीत विद्युत विजबील माफ केले. औरंगाबाद शहरातील प्रती महीना विजबिलापोटी महावितरणला ५४ कोटीचे उत्पन्न मिळते मग लॉकडाऊनच्या काळातील तीन महीन्याचे विद्युत बील माफ करण्यास शासनाची काय हरकत आहे. थकीत विजबील वसूलीसाठी महावितरणचे कर्मचारी विजेचे कनेक्शन तोडण्यासाठी आल्यास त्यांना उचलून माझ्या कार्यालयात आणा असा इशारा खा. सय्यद इम्तियाज जलील यांनी यावेळी दिला.