IndiaCrimeUpdate : प्रेमासाठी हि अल्पवयीन मुलगी आई -बाबाच्या जीवावर उठली , प्रियकराच्या मदतीने काढला काटा

इंदौरच्या छोटा बांगडदा येथील रुक्मिणी नगर येथे १५ व्या बटालियनचे सैनिक ज्योतिप्रसाद शर्मा आणि त्यांची पत्नी नीलम यांच्या हत्येचं कारस्थान त्यांच्या अल्पवयीन मुलीनेच रचल्याचे धक्कादायक वृत्त आहे. तिला प्रियकर धनंजयबरोबर राहायचे होते. मात्र तिचे आई-वडील तिच्यावर निर्बंध लावत होते. यावर तिने स्वत: त्यांना मारण्याचा कट रचला आणि भाजीमध्ये १२ झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि आपल्या आई-वडिलांचाच खात्मा केला.
याबाबत डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीचे आई -वडील झोपी जाताच तिने आरोपी धनंजय यादव (डीजे) याला चाकू घेऊन बोलावले व त्यांची हत्या केली आणि कायमचे झोपविले.दरम्यान हत्येनंतर पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीला तिचा प्रियकर धनंजयसह गुरुवारी रात्री मंदसौरमधील कैलास मार्गावरील हॉटेलमधून अटक करून इंदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मयत ज्योतिप्रसादची १६ वर्षांची मुलगी केंद्रीय विद्यालयात दहावीत शिकते. दोन वर्षांपासून तिचं गांधीनगर येथे राहणाऱ्या धनंजयशी प्रेमसंबंध होते. पण ज्योती यांना तिच्या मुलीने डीजेला भेटणे पसंत नव्हते. त्यामुळे मुलीने दोघांनाही मार्गातून हटविण्याचा कट रचला.
आरोपींचा कबुली जबाब
या हत्येचा कबुलीजबाब देताना आरोपी धनंजय म्हणाला कि , मला ज्योतिप्रसादची अल्पवयीन मुलगी आवडते. मात्र तिचे आई-वडील आम्हाला त्रास देत होते. कधीही मोबाइल तपासतात. दोन दिवसांपूर्वीही आम्हा दोघांना रोहितच्या फ्लॅटमध्ये त्यांनी पाहिले होते. याशिवाय मुलीच्या भावाचे मित्रही माझा पाठलाग करीत होते. मुलीने मला सांगितले की, त्यांना मारणं गरजेचं आहे. या कटाचा भाग म्हणून, एक दिवस आधी, मी गांधीनगर येथून ५०० रुपयांना चाकू विकत घेतला. संध्याकाळी चारच्या सुमारास मी मित्राची स्कूटर घेऊन आलो आणि ज्योती व नीलम यांना ठार मारल्यानंतर मी तेथून पळ काढला.
मुलाच्या जबाबानंतर मयत ज्योतिप्रसाद यांच्या १६ वर्षांच्या मुलीने सांगितलं की, मी आई-वडिलांना वैतागले होते. धनंजयला भेटणं त्यांना पसंत नव्हतं. यामुळे घरातील वातावरणही बिघडलं होतं. रोज आमच्यात वाद होत होता. सुरुवातीला मी डिजेसोबत पळून जाण्याचा विचार केला. मात्र मला वडिलांनी कुठूनही शोधून काढलं असतं. कारण ते पोलिसात आहेत. त्यामुळे त्यांना मारण्याचा निर्णय घेतला.
झोपेत केला हल्ला
या दोधांच्याही पूर्वनियोजित कटानुसार मुलीच्या आई-वडिलांच्या हत्येसाठी डीजेला तयार करण्यात आलं आणि आदल्या दिवशी त्याच्याकडून झोपेच्या गोळ्या मागवल्या. ठरलेल्या कारस्थानानुसार त्या दिवशी सायंकाळी मुलीने स्वयंपाक केला. आणि आई-वडिलांसाठी वेगळी भाजी केली. एका भाजीत डिजेने दिलेल्या गोळ्या टाकल्या. त्यावेळी ज्योतिप्रसाद दारूच्या नशेत होते. रात्री उशिरापर्यंत ती त्यांच्या झोपण्याची वाट पाहत होती. दरम्यान जसे दोघे गाढ झोपेत गेले, तिने डिजेला बोलावलं आणि तो आल्यानंतर मुलगी दरवाजा उघडून कुत्रा फिरविण्याच्या बहाण्याने बाहेर गेली. डिजे सरळ तिच्या आई जवळ गेला आणि तिच्यावर वार करू लागला. आवाज ऐकून वडील बेडरुमबाहेर आले. तेंव्हा त्याने त्यांच्यावरही चाकूचे प्रहार केले यावेळी ते स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र दारुच्या नशेत असल्याने त्यांना स्वत:ला वाचवणं जमलं नाही त्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला.