HathrasGangRapeAndMurderCase : हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल होताच प्रियांका गांधी यांनी दिली हि प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे नमूद करीत सीबीआयने आरोपींविरुद्ध बलात्कार आणि हत्या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपी संदीप, लवकुश, रवि और रामू यांच्यावर सीबीआयने हा आरोप ठेवल्याचे आणि त्यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती -जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाही लावण्यात आला असल्याचे आरोपीचे वकील मुन्ना सिंह पुंढीर यांनी सांगितले आहे. हे वृत्त समजताच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ” सत्यमेव जयते ” असे नमूद करून आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , एकीकडे सरकारकडून होत असलेला अन्याय होता आणि पीडित परिवाराला न्यायाची अशा होती. पीडितेचा मृतदेह जबरदस्तीने जाळण्यात आला. तिच्या कुटुंबीयांची बदनामी करण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला परंतु शेवटी सत्याचा विजय झाला.
एक तरफ सरकार सरंक्षित अन्याय था।
दूसरी तरफ परिवार की न्याय की आस थी।पीड़िता का शव जबरदस्ती जला दिया गया। पीड़िता को बदनाम करने की कोशिशें हुईं। परिवार को धमकाया गया।
लेकिन अंततः सत्य की जीत हुई।
सत्यमेव जयते#HathrasCase pic.twitter.com/X4qD0BVjjs
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 18, 2020
हाथरस जिल्ह्यातील एका गावात गेल्या १४ सप्टेंबरला २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर तिचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला होता. तर मृत्यूनंतर निर्माण झालेल्या तणावाला घाबरून पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने परस्पर तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. या सर्व प्रकरणावरून उत्तर प्रदेश आणि देशभरात संतापाची लाट उसळली होती. काँग्रेसनेते राहुल गांधी , प्रियांका गांधी , आपचे नेते, समाजवादी पक्षाचे नेते यांना पोलिसांकडून धक्काबुक्की , मारहाण झाली होती. तर अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना पोलिसांच्या लाठ्या खालल्या होत्या.
दरम्यान पीडितेच्या बाजूने तिला न्याय मिळावा म्हणून अनेक पक्ष , संघटना प्रयत्न करीत असताना आरोपीच्यावतीने गावातील सवर्णांनी पीडितेच्या कुटुंबियांच्या विरोधात वातावरण निर्माण केले होते. तर मुख्य आरोपीने पीडितेच्या भावाने आणि आईनेच तिची हत्या घडवून आणल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. हि सर्व परिस्थिती लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद कोर्टाच्या निगराणीत सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सीबीआयने आपली चौकशी पूर्ण करून आरोपींना बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरवत हाथरस जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने पूर्ण तपासानंतर आपल्या आरोपपत्रात आरोपींविरुद्ध भादंवि ३०२ , ३७६, ३७६ (अ ) ३७६ (ड ) आणि ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई केली आहे.