MaharashtraNewsUpdate : राज्यसेवा आयोगाच्यानंतर महावितरणच्या भरतीलाही मराठा संघटनांचा विरोध

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महावितरणमधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करायचे आदेश दिल्यानंतर आता मराठा समाजात असंतोष पसरला आहे. यासंबंधीचा शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. पण, मराठा समाजाकडून शासनाच्या या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला आहे. या आधी मराठा समाजाने एमपीएससीच्या परीक्षांनाही विरोध केला होता. याचा फटका सर्वच विद्यार्थ्यांना बसला आहे.
एसईबीसी प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवून ही भरती होणार आहे. त्यामुळे इतर सवर्गातील उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबद्दल निर्णय दिल्यानंतर एसईबीसी गटातून नियुक्त उमेदवारांची प्रक्रिया पुन्हा एकदा राबवली जाईल, असंही महावितरणने स्पष्ट केले आहे. मात्र, जोपर्यंत आरक्षणाबाबतचा अंतिम निकाल येत नाही तोवर कुठलीच भरती करू नये अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे इतर प्रवर्गातील उमेदवारांनी शासनाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. ‘आमचे वय वाढत असल्याने आमची संधी हुकून नये म्हणून राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे’ असं दुसऱ्या वर्गातील उमेदवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे महावितरणच्या भरतीवरून नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहे. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आंदोलन करत आहे. मागील महिन्यात मराठा समाजाने एमपीएसीच्या परीक्षा रद्द कराव्या अन्यथा परीक्षा केंद्र फोडून टाकू असा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने एमपीएसीच्या परीक्षा कोरोनाचे कारण देऊन रद्द केल्या होत्या. पण, आता पुन्हा एकदा महावितरणच्या भरतीवर मराठा समाजाने आक्षेप घेतला आहे.