IndiaNewsUpdate : दलित तरुणीशी विवाह केल्याच्या रागातून तरुणाचा खून , पाच जणांना पोलीस कोठडी

भारतात जातीव्यवस्था संपत चालली असल्याचे दावे केले जात असतानाच एका दलित तरुणीशी विवाह केल्याच्या रागातून एका २८ वर्षीय व्यक्तीवर काही लोकांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यात या व्यक्तीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. या व्यक्तीने पाच महिन्यांपूर्वी एका दलित महिलेशी लग्न केले होते. त्यानंतर या व्यक्तीला धमक्या मिळणे सुरू झाले होते, असा आरोप या व्यक्तीच्या भावाने केला आहे. आकाश असे या व्यक्तीचे नाव असून हि घटना गुडगावमध्ये घडली असल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश रविवारी पत्नीसोबत गुडगावच्या बादशाहपूरमध्ये राहत असलेल्या त्याच्या आई-वडिलांना भेटायला गेला होता. तेथेच त्याच्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणात आतापर्यंत पाच लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश बादशापूर येथून ऑटोरिक्षाने परत येत होता. त्यावेळी ऑटोरिक्षा ५ आरोपींपैकी एक असलेल्या विजय नावाच्या आरोपीला धडकली. विजय चालत होता. यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद वाढत मारहाणीपर्यंत पोहोचला. विजयने आपल्या काही मित्रांना बोलावले. त्यानंतर सर्वांनी मिळून आकाशला जबर मारहाण केली आणि सर्वजण पळून गेले. या आरोपींना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आकाशने गावातील एका दलित महिलेशी लग्न केले हे या पाचही आरोपींना माहीत होते, असे पोलिसांनी सांगितले. गावातील काही तरुणांनी आकाशला दलित महिलेशी लग्न केल्याबद्दल धमकी दिली होती, असे आकाशच्या भावाने एफआयआरमध्ये म्हटले आहे. गावातील काही तरुण आकाशने केलेल्या आंतरजातीय विवाहामुळे नाखुश होते आणि माझ्या भावाला त्यांनी धमकी दिली होती. जर तो गावात आला तर आम्ही त्याला सोडणार नाही, अशी त्यांनी धमकी दिल्याचे आकाशच्या भावाने सांगितले. आकाश कथित रुपात उच्च जातीचा होता. तो शेजारी राज्य राजस्थानमधील अलवरचा रहिवासी होता. तो आणि त्याची पत्नी गुडगावच्या भोंडसी येथे राहत होते.