IndiaNewsUpdate : बाबरी मशीद निकाल : अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल : प्रकाश आंबेडकर

लखनौ न्यायालयावर अनेक नेत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया येत असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे . त्यांनी म्हटले आहे कि , भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल. अयोध्येतील बाबरी मशीद प्रकरणावर बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यात प्रामुख्याने लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ लोकांवर बाबरी मशीद पाडल्याचा आरोप होता. दरम्यान आज आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष सोडून देण्यात आलं. न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहिताचे नाही. लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाईल, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी दिले. धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे. तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.