MaharashtraNewsUpdate : मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण शक्य नाही , मराठा समाजाचा विचार करताना ओबीसींचा विसर नको , भुजबळ ,वडेट्टीवार यांचा सल्ला

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली असली तरी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनाच आवाहन करत ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाज नाराज होणार नाही याची काळजी घ्या असे म्हटले. याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले कि , मराठा समाजाला ईडब्लूएस कोट्याचून आरक्षण देण्याचा निर्णय व्हायला हवा. गरीब समाजाला न्याय देण्यासाठी निर्णय झाला असला तरी ५२टक्के ओबीसींसाठी या विषयाची चर्चा करणे गरजेचे आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण शक्य नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या विषयाबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ओबीसी समाज नाराज होता कामा नये, अशी आपली भूमिका असून ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक महामंडळ यांनाही निधी मिळाला पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे पण त्याचवेळी ओबीसींवर अन्याय नको इतकीच आमची मागणी आहे. मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण शक्य नाही. आमची आग्रही मागणी ओबीसी कोट्यातून आरक्षण नको एवढीच आहे. मंत्रिमंडळातले विषय बाहेर बोलायचे नाहीत पण ओबीसी विषय कायमच मांडत आलो आहे असंही त्यांनी सांगितले. मराठा समाजाबाबत झालेल्या बैठकीतही छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती असे सांगण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात अडकल्याने राज्य सरकारने मराठा समाजासाठी मंगळवारी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत . त्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मुद्यांवर मराठा नेते विरुद्ध ओबीसी नेते असे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निर्णय घेतांना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. हा विषय संवेदनशील असल्याने आणि दोनही समाजाची संख्या ही मोठा असल्याने सरकारला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार हे मात्र निश्चित. दरम्यान मराठा समाज, विद्यार्थी आणि तरुणांना आर्थिक मदत देताना ओबीसी आणि धनगर समाजातील लोकांचा त्यांचा विसर पडू देऊ नका अशी भूमिका काही कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली होती. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे विजय वड्डेटीवार या मंत्र्यांनी ओबीसी समाज महामंडळासाठी ‘सारथी’च्या धर्तीवर आर्थिक पॅकेजच्या मदतीची मागणी केली आहे.