खा. संजय राऊत , मु. पो. दिल्ली : सत्ता गेली म्हणून महाराष्ट्राला बदनाम केलं जात आहे … !!! महाराष्ट्रातील घटनांचा केला खुलासा

कोणता पक्ष महाराष्ट्राबाबत काय विचार करतो हे सर्वांना माहीत आहे. सत्ता गेली म्हणून महाराष्ट्राला बदनाम केलं जात आहे. थोडा संयम ठेवा. एवढे उतावीळ होऊ नका. राजकारणात सत्ता येते-जाते. लोकशाहीत सर्व काही स्थिर नसतं, काळ बदलत असतो. तो कायम तसाच राहत नाही. शिवसेना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात करोनापासून ते चीनपर्यंतच्या देशहिताच्याच मुद्द्यावर आवाज उठवणार आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचं समर्थन करत नाही. निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला याचं आम्हाला दु:ख आहे. पण आदर हा दोन्हीकडून व्हावा. राज्याच्या प्रमुखांविषयी बोलताना आदरच ठेवला पाहिजे, असे सांगत असताना हल्ला करणाऱ्यांनी आम्हाला विचारून हल्ला केला नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले कि , मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. मुख्यमंत्रिपद हे संविधानिक पद आहे. याची जाणीव सर्वांनाच असायला हवी. त्यामुळे या पदाचा आदर ठेला पाहिजे. आदर हा दोन्हीकडून असायला हवा. तुम्हीही काहीही करणार आणि लोक गप्प बसणार असं कधी होत नाही. संविधानिक पदावरील व्यक्तीबद्दल बोलल्यास लोकांना राग येणारच. त्यात सरकारचा दोष काय?, असा सवाल करतानाच एवढा मोठा महाराष्ट्र आहे. १२ कोटी लोक राहतात. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांनी आम्हाला विचारून हल्ला केला नाही. हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं. माझ्याही बाबतीत होऊ शकतं, असं संजय राऊत म्हणाले.
उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी खा. संजय राऊत दिल्लीत आले असून ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दिली. ते म्हणाले कि , आम्ही कोणत्याही मारहाणीचं समर्थन करत नाही. पण तुम्ही वातावरण बिघडवू नका, त्यांच्या मागे कोण आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांना पकडलं असून त्यांना कोर्टासमोर उभं केलं, असं सांगतानाच राज्याची कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या प्रकरणारत रस घेत आहेत. घेऊ द्या. बिहारमध्ये एका कॅप्टनला घरात घुसून मारण्यात आलं. तेव्हा राजनाथ सिंह कुठे होते?, असा सवाल करतानाच लष्कराविषयी आम्हाला नेहमीच आदर आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राजनाथ सिंह मुंबईतील एका प्रकारावर बोलतात. पण चीनच्या हल्ल्यावर बोलत नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला. आमच्यासाठी कंगना हा विषय आता बंद झाला आहे. त्यावर बोलणं आम्ही बंद केलं आहे. आता आम्ही फक्त ऐकणार, पण बोलणार नाही. प्रत्येक गोष्ट आम्ही नोंद ठेवू, असं सांगतानाच ज्या पोलिसांना माफिया संबोधलं आज त्याच पोलिसांचे त्यांनी संरक्षण घेतलंय, असा टोलाही त्यांनी कंगनाला नाव न घेता लगावला.