MaharashtraNewsUpdate : विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन : प्रकाश आंबेडकर यांच्या दणक्याने पंढरपुरात तगादा बंदोबस्त

दारू, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे व ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला विचारला आहे. सरकार प्रतिसाद देत नसल्याने ३१ ऑगस्टला मोठ्या संख्येने पंढरपूरला जमण्याचे समस्त वारकरी बांधवांना आवाहन करतोय. pic.twitter.com/6mi93QjpwL
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 25, 2020
राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी उद्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पंढरपुरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. प्रकाश आंबेडकर उद्या पंढरपुरात दोन लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पंढरपुराकडे येणारी एसटी वाहतूक बंद केली असून नाकाबंदी करण्यात आली आहे.
दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत असताना अनेक गोष्टींना सूट दिली आहे. मात्र, मंदिर प्रवेशाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आता वारकऱ्यांना पाठिंबा देत मंदिर प्रवेशाचा मुद्दा हातात घेतलेला आहे. उद्या पंढरपुरात प्रकाश आंबेडकर दोन लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत दाखल होणार असल्याचे आधीच सांगण्यात आले आहे. राज्य सरकारनं ३१ ऑगस्टपूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लाखो लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. परंतु राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे.
या पूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर राज्यातील एसटी, बस सेवा चालू करण्यात आली. पानटपऱ्या, सलून तसेच इतर व्यवसायही या मुळे सुरू झाले. मात्र मंदिरं अद्यापही बंद आहेत. दरम्यान शासनाने ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर लाखो वारकरी ३१ ऑगस्ट रोजी मंदिरात प्रवेश करतील, हे लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,’ असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
दरम्यान राज्यात दारू, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे व ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला केला आहे. सरकार प्रतिसाद देत नसल्याने ३१ ऑगस्टला मोठ्या संख्येने पंढरपूरला येण्याचे आवाहन वारकरी बांधवांना करण्यात आले आहे.