IndiaPoliticsUpdate : काँग्रेस -भाजप यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध , भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा राहुल -सोनियावर पलटवार

भाजप आणि काँग्रेसमध्ये सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध सुरु असून कॉंग्रेस नेते राहुल गांधी , सोनिया गांधी , प्रियांका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवरून अनेक आरोप केले जात आहेत . या आरोपांना भाजपकडून , संघाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे . फेसबुकच्या पक्षपातीपणावरून तर काँग्रेसने भाजपला चांगलेच घेरले आहे . दरम्यान राहुल गांधी यांनी “पीएम केअर्स फंडा” वरून सरकारवर हल्लाबोल करताना यांनी या फंडाचे वर्णन ‘राइट टू इम्प्रोबिटी’ असे केले होते. या टीकेला उत्तर देताना भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एकामागून एक ट्विट करून राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या या उपक्रमावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे, असे सुनावले आहे.
आपल्या ट्विटमध्ये नड्डा यांनी म्हटले आहे कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवताना जनतेने हा विश्वास व्यक्त केला आहे. पराभूत झालेले तुमच्या सारखे लोक केवळ खोट्या बातमी पसरवू शकतात. कोरोनाविरोधी लढाईत संपूर्ण देश एकजूट झाला आहे. पण चीनकडून पैसे घेऊन तुम्ही आणि तुमच्या आईने तर देशहिताला ठेच पोहोचवली आहे. तुम्ही पैसे घेतले आहेत, असा आरोप जे.पी. नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
नड्डा यांनी पुढे म्हटले आहे कि , आपल्या घराण्यातील संशयास्पद वारशामध्ये पीएमएनआरएफमध्ये एक स्थायी स्थिती लागू करणं आणि नंतर आपल्या घराण्याच्या संस्थेत पीएमएनआरएफकडून पैसे वळवण्याचा देखील यात समावेश आहे. दरम्यान या ट्विटला काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाच्या वतीने उत्तर देताना पीएम-केअर्स फंडात आलेल्या सुमारे १० हजार कोटी रुपयांची माहिती काँग्रेसने मागितली होती. यामुळे या फंडाला देणगी देणाऱ्यांची नावंही चिनी कंपन्यांसोबत जाहीर करावी, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.
दरम्यान सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून शब्दांची लढाई तीव्र झाली आहे. पीएम केअर्स फंडावरील ट्विट करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी फेसबुकबद्दल ट्विट केलं होतं. फेसबुक आणि भाजपवर आरएसएसचे नियंत्रण आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. यावर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी पलटवार करताना तुम्ही या गोष्टी बोलत आहात. पण निवडणुकीदरम्यान तुमची डेटा चोरी पकडली गेली होती, असे प्रसाद यांनी म्हटले होते त्याला उत्तर देतानाही सुरजेवाला यांनी खोटे बोलणे सोडा असा सल्ला देत भाजपवर केंब्रिज अॅनालिटिकाची सेवा घेतल्याचा आरोप करत आणखी पाच प्रश्न विचारले होते.