CoronaVaccineIndiaUpdate : जाणून घ्या , भारतात कोरोनावरील लस “कोवॅक्सिन” कधीपर्यंत येईल ? काय आहे प्रगती ?

सहा महिने उलटून गेले तरी जगात सर्वत्र कोरोनाची दहशत कायम आहे . परिणामी देशातही सध्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील वैज्ञानिक आत्यन्तिक परिश्रम घेऊन कोरोनावरील लस विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच प्रयत्नातून भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या “कोवॅक्सिन” या लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीमध्ये लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. चाचणीच्या प्राथमिक टप्प्यातील निकालांनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील काही शहरांमध्ये भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या कंपन्यांच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. इकॉनॉमिक टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले असून लस तयार करण्याच्या प्रयत्नाबाबत आज स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आशादायक उल्लेख केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार भारत बायोटेककडून भारतातील १२ शहरांमध्ये ३७५ स्वयंसेवकांवर करोना लसीची चाचणी करण्यात आली. प्रत्येक स्वयंसेवकाला या लसीचे दोन डोस देण्यात आले. यानंतर त्यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. “ही करोना लस संपूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही जेवढ्या स्वयंसेवकांना ही लस दिली त्यांच्यावर कोणतेही साईडइफेक्ट्स जाणवले नाहीत,” अशी माहिती पीजीआय रोहतकमध्ये सुरू असलेल्या चाचणीच्या टीम लीडर सविता वर्मा यांनी दिली. आता स्वयंसेवकांना लसीचा दुसरा डोस देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या रक्ताचे नमूने गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रक्ताच्या नमून्यांद्वारे लसीच्या इम्युनॉडेनिसिटीचा अभ्यास करण्यात येणार आहे.
या लसीबाबत अधिक माहिती देताना सविता वर्मा म्हणाल्या कि , “ही लस संपूर्णपणे सुरक्षित आहे याची आम्हाला खात्री झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ही लस किती प्रभावशाली ठरते हे पाहिलं जाणार आहे. त्यासाठी आम्ही रक्ताचे नमूने घेण्यास सुरूवात केली आहे,” दरम्यान “ही लस सुरक्षित आहे. एम्समध्ये भारत बायोटेकच्या लसीच्या चाचणीसाठी १६ स्वयंसेवकांना दाखल करण्यात आलं होतं,” अशी माहिती दिल्लीतील एम्सचे प्रमुख संजय राय सांगितले. सध्या जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाची लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सरकारही या प्रक्रियेवल लक्ष ठेवून आहे. कोवॅक्सिन ही देशातील पहिली लस असून भारत बायोटेकद्वारे आयसीएमआरसोबत ही लस विकसित करण्यात येत आहे. सर्व १२ ठिकाणी या लसीच्या सुरक्षिततेचे निकाल पाहिल्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाशी कंपनी दुसऱ्या टप्प्यात संपर्क साधणार आहे. जर सर्व बाबी योग्य असतील तर पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती एका वैज्ञानिकानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.