MaharashtraNewsUpdate : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली असतानाच आज एका बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासाबाबत महत्त्वाचे विधान करीत या चर्चांना पूर्णविराम दिला. विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांनी सुशांतसिंहच्या आत्महत्येबाबत देशमुख यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. सुशांतसिंहच्या आत्महत्येचा तपास राज्य सरकार केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवणार आहे का?, असा प्रश्न विचारला असता त्यास देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ‘महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणी योग्य दिशेने तपास करत आहेत. हा तपास सीबीआयकडे देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही’, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे आ. पार्थ पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना एक निवेदन देऊन सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. ‘सुशांतसिंहच्या आत्महत्येमुळं देश हळहळला होता. सुशांतचं अकाली जाणं म्हणजे आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या देशभरातील तरुणाईच्या महत्त्वाकांक्षेचा मृत्यू आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांतून मला ई-मेल, फोन आणि मेसेज येत आहेत. या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली जात आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी सर्वांची भावना आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे. जनभावनेची दखल घेऊन आपण हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI) विभागाकडे सोपवावे, अशी आपणास विनंती असल्याचे पार्थ यांनी या निवेदनात नमूद केले होते.
दरम्यान मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र, सीबीआयकडे हे प्रकरण गेल्यास ते न्यायोचित ठरेल. राज्याचं गृहखातं या प्रकरणातील गांभीर्य व तातडी लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेईल,’ अशी अपेक्षाही पार्थ यांनी व्यक्त केली होती. मात्र, गृहमंत्र्यांनी ठोस भूमिका घेत ही मागणी नाकारल्याचे दिसत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर जवळपास दीड महिन्याने वडील के. के. सिंह यांनी पाटणा येथील राजीव नगर येथे सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यासह चार जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केले असून सात पानी एफआयआरमध्ये अनेक आरोप करण्यात आले आहेत. रियावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांची टीम वांद्रे येथील सुशांत राहत असलेल्या अपार्टमेंटचा पुन्हा तपास करणार आहे, असे कळते.