मोदी सरकारचा धक्कादायक निर्णय : देशातील १०९ मार्गांवर १५० खासगी रेल्वेगाड्यांना धावण्यास परवानगी

मोदी सरकारने अनेक गोष्टींचे खासगीकरण करण्याचा सपाट लावला असून देश कोरोना संकटाशी लढा देत असताना , रेल्वेने बुधवारी एक धक्कादायक घोषणा केली असून या निर्णयायानुसार 109 मार्गांवर खासगी सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वेने सुरू केली आहे. या ठराविक मार्गांवर दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या आधुनिक 151 रेल्वेगाड्या खासगी तत्त्वावर चालवण्यात याव्यात असा रेल्वेची योजना आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की यातून भारतीय रेल्वेला 30 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या योजनेद्वारे प्रथमच प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित करण्यात येत आहे.
दरम्यान गेल्या वर्षीच या प्रयोगानुसार भारतीय रेल्वेने RCTC च्या माध्यमातून लखनौ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस ही आलिशान प्रवासी गाडी सुरू केली आहे. रेल्वेने या पत्रकात म्हटले आहे की, रोजगार निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यावर होणाऱ्या देखभाल खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने खासगी क्षेत्राला रेल्वेने आमंत्रित केले आहे. प्रवाशांना वर्ल्ड क्लास अनुभव आणि सुरक्षित प्रवास देण्याबरोबर यातून रोजगार निर्मितीही होईल.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 150 अत्याधुनिक रेल्वेगाड्या यासाठी वापरण्यात येतील. यातल्या बहुतेक गाड्यांची निर्मिती भारतात झालेली आहे. प्रत्येक गाडीला किमान 16 डबे असतील. ताशी 160 किमी वेगाने धावणाऱ्या या गाड्या असतील. त्या त्या रूटवरच्या सर्वांत वेगवान गाडीच्या तुलनेतच या खासगी गाड्यांचा वेग अधिक असेल. या सर्व खासगी रेल्वेगाड्या भारतीय रेल्वेच्या म्हणजे सरकारी ड्रायव्हर आणि गार्ड्सकडूनच चालवण्यात येतील. या गाड्यांच्या निर्मितीपासून, देखभाल आदी सेवा पूर्णपणे Make in India अर्थात भारतीय बनावटीच्या असतील. या गाड्यांच्या निर्मितीचा खर्च, दररोजचा खर्च आणि इतर खर्च खासगी संस्था करेल आणि प्रवाशांसाठी अत्याधुनिक आणि वेगवान प्रवासाची सुविधा निर्माण करणं हा उद्देश यामागे आहे, असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.