चर्चेतली बातमी : महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत अमित शहा यांचा मोठा खुलासा

भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यपालांना भेटून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती, त्यावर बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले कि , राणे हे सभागृहाचे सदस्य आहेत आणि देशातील इतरांप्रमाणेच त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे. महाविकास आघाडीतीलच पक्ष नाराज झाले आणि आघाडी सोडून गेले, तर महाराष्ट्र सरकार पडण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही, असं वक्तव्य अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं. भाजप सरकार पाडण्याच्या कोणत्याही प्रयत्नात नाही, पण आघाडीतीलच सदस्य नाराज झाल्यास सरकारला कुणीही वाचवणार नाही, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार अस्थिर केलं जात असल्याचे आरोप केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी हे मोठे वक्तव्य केले.
अमित शहा पुढे म्हणाले कि , आघाडीतील तीन पक्षांचा एकमेकांवर विश्वास असेल, तर सरकार कसं पडेल? पण जर सरकारमध्ये असलेलेच सदस्य जर नाराज झाले आणि बाहेर पडले तर सरकारला कुणीही वाचवू शकत नाही, असं म्हणत सरकार पडल्यास ते अंतर्गत कारणांमुळेच पडेल. राष्ट्रवादी आणि भाजपात मागच्या दाराने काही चर्चा सुरु आहे का ? या प्रश्नाचे उत्तर देताना अमित शहा म्हणाले कि , सध्या संकटाचा काळ सुरू असून कोणत्याही राज्यातील सरकार अस्थिर करण्यात भाजपला रस नाही.
दरम्यान केंद्र सरकार इतर राज्यांप्रमाणेच करोना संकटाच्या काळात महाराष्ट्र सरकारसोबत आहे, असेही अमित शाहांनी स्पष्ट केले. राज्यातील करोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नसल्यामुळे ते नाराज असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. आम्ही निर्णयकर्ते नसून सरकारला फक्त पाठिंबा दिलेला आहे असे काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी म्हटल्यानंतर पवारांनी सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे या वादावर पडदा पडला आहे.