MaharashtraNewsUpdate : राज्यातील शाळा जूनमध्ये नव्हे , जुलैमध्ये चालू होतील : अजित पवार

राज्यातील शाळा १ जुलैला सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिल्यामुळे राज्यात जून महिन्यात शाळा सुरू करण्याच्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा कधी सुरू होतील, या प्रश्नाबाबत पालक आणि मुख्याध्यापकांची सातत्याने चर्चा सुरू आहे. याबाबत राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अनुशंगाने नगरसेविका अश्विनी कदम यांनी अजित पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यावेळी पवार यांनी शाळा सुरू होण्याबाबत सविस्तर माहिती दिली.
पवार म्हणाले की, राज्य सरकारचे जून महिन्यात शाळा सुरू करण्याबाबत अजिबात काही ठरलेले नाही. मी कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे. आमचा १ जुलैला शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत अंतिम कोणताही निर्णय झालेला नाही. १ जुलैला शाळा सुरू केल्यानंतरही सुरुवातीचे काही दिवस बुडतील. या सर्व बुडालेल्या दिवसांची भरपाई ही दिवाळी आणि ख्रिसमसची सुट्टी कमी करून करता येईल. त्यानंतर एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्ट्या देखील कमी करून शैक्षणिक दिवस भरून काढण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती पवार यांनी दिली आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, शाळा १५ जुलैनंतर सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दरम्यानच्या काळात शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांच्या नावाने शाळा जूनमध्ये सुरू होणार, अशा बातम्या आल्यानंतर पालक पॅनिक झाले. त्यांनी राज्य सरकारकडे विचारणा करून, आपली काळजी व्यक्त केली. करोनाचे संकट असताना, आपण आपल्या मुलांना शाळेत कसे पाठवायचे, अशी भीती पालकांना वाटते. आम्हीपण त्यांच्या मताशी सहमत असून योग्य तो निर्णय घेऊ, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.