#CoronaMaharashtraUpdate : डिस्चार्ज रुग्णांच्या तुलनेने तिप्पट रुग्ण वाढ , राज्यातील रुग्णसंख्या ४७ हजारावर

राज्यात आज दिवसभरात करोनाचे २६०८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर त्याचवेळी ८२१ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा ५० हजारच्या दिशेने मार्गक्रमण करत असून आज हा आकडा ४७,१९० वर पोहचला आहे. सध्या प्रत्यक्षात ३२,२०१ करोना बाधित रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. दरम्यान राज्यात आज करोनामुळे आणखी ६० जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची एकूण संख्या १ हजार ५७७ इतकी झाली आहे. आज राज्यात ६० रुग्ण दगावले. त्यात मुंबई पालिका हद्दीत सर्वाधिक ४० रुग्ण दगावले तर त्याखालोखाल पुण्यात १४ रुग्णांचा मृत्यू झाला. सोलापुरात २ तर वसई-विरार, सातारा, ठाणे, नांदेडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ६० मृतांपैकी ४२ रुग्णांचा मृत्यू गेल्या २४ तासांत झाला आहे तर उर्वरित मृत्यू गेल्या पंधरवड्यातील आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत. तर २४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. सात जण ४० वर्षांखालील आहेत. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आज दिवसभरात राज्यात २ हजार ६०८ करोना बाधित नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४७ हजार १९० इतकी झाली आहे. आज दिवसभरात राज्यात ८२१ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आजतागायत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४७ हजार १९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ३३ हजार ५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या २ हजार ३४५ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण १६ हजार ४१४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.९१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.