#CoronaVirusUpdate : महाराष्ट्र : आज दिवसभरात ….राज्यातील एकूण करोना रुग्णांचा आकडा २३ हजारावर तर करोना बळींची एकूण संख्या ८६८

राज्यात आज दिवसभरात १ हजार २३० नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली असल्याने राज्यातील एकूण करोना रुग्णांचा आकडा २३ हजार ४०१ इतका झाला आहे. शिवाय गेल्या २४ तासात ३६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईमधील २० रुग्णांचा समावेश आहे. सोलापूर शहरात पाच, पुण्यात तीन, ठाणे शहरात दोन तर औरंगाबाद शहर, नांदेड शहर, अमरावती जिल्हा, रत्नागिरी आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील करोना बळींची एकूण संख्या ८६८ इतकी झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टॉपटे यांनी दिली आहे.
आज दिवसभरात ५८७ रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २ लाख ४८ हजार ३०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, १५ हजार १९२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. अशा ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्लस्टर कृती योजना अंमलात आणली जाते. राज्यात सध्या १ हजार २५६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून, १२ हजार ०२७ सर्वेक्षण पथकांनी काम करुन ५३ लाख ७१ हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान आज झालेल्या मृत्यूंपैकी २३ पुरूष तर १३ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यापुढील वयोगटातील १७ रुग्णांचा तर ४० ते ५९ वयोगटातील १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४० वर्षाखालील तीन रुग्ण दगावले आहेत. एकूण ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्दयरोग असे अतिजोखीमेचे आजार आढळले आहेत. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या ८६८ इतकी झाल्याचे टोपे यांनी सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १८ हजार ९१४ नमुन्यांपैकी १ लाख ९३ हजार ४५७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर २३ हजार ४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत असे ते म्हणाले.