#PalgharMobLynching : राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची राज्याच्या पोलीस आयुक्तांना नोटीस

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पालघरमधील बहुचर्चित मॉब लिंचिंग प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. येत्या ४ आठवड्यात नोटीसला उत्तर द्यावं, असे आयोगाने म्हटले आहे. पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा स्पष्टपणे निदर्शनास आला आहे. पोलिसांच्या उपस्थितीत हे हत्याकांड घडले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात काय कारवाई केली. तसंच मृतांच्या निकटवर्तीयांना काय मदत केली? याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हटलं आहे.
दरम्यान करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत पोलीस आणि प्रशासनाचा बंदोबस्त कडक असायला हवा होता. तरीही पोलिसांदेखत निष्पाप साधूंची हत्या करण्यात आली. या घटनेत माणसाच्या जगण्याचा अधिकार हिसकावला गेलाय, असे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नमुद केले आहे. पालघरमध्ये १६ एप्रिलला जुन्या आखाड्याच्या दोन साधूंची आणि त्यांच्या गाडीच्या चालकाची जमावाने निर्घृण हत्या केली. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात ही घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ प्रमुख हल्लेखोरांसह एकूण १०५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.