#CoronaVirusUpdate : राज्यातील ८३ टक्के कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दुर्धर आजरांमुळे : राजेश टोपे

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३२०२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ३०० लोक या आजारातून बरे झाले आहेत. राज्यात चाचण्यांचं प्रमाण आपण वाढवीत असून, त्यासाठी एकूण ३६ लॅब आपण उपलब्ध करून देत असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत राज्यात १९४ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा दर अधिक आहे. ८३ टक्के मृतांना दुर्धर आजार होते. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मृत्यू झाले आहेत, त्यांचे ऑडिट होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
टोपे पुढे म्हणाले कि , राज्यात कंटेन्मेंट कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून सहा दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात अजून सहा ठिकाणी करोना चाचणीची सुविधा सुरू करणार असल्याने राज्यातील प्रयोगशाळांची संख्या ३६ होईल, असे टोपे यांनी सांगितले. राज्यात आज, गुरुवारी करोनाबाधित २८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ३२०२ झाली आहे. आज दिवसभरात ५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३०० रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर ३२०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७१,०७६ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, ६१०८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज राज्यात ७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे ३, पुण्यातील ४ आहेत. त्यापैकी ५ पुरुष तर, २ महिला आहेत. ४ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत, ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये (८६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. करोनामुळे राज्यातील मृत्यूंची संख्या आता १९४ झाली आहे.
राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. या मृत्यूंची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी तसेच जिल्हा पातळीवर रुग्णोपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे. यामुळे राज्यात करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक हॉटलाइन उपलब्ध होणार आहे. या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांना सोमवार ते रविवार असे दिवस वाटप करण्यात आले असून या टास्क फोर्समध्ये शासकीय तसेच खासगी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. डॉ. झहीर उदवाडिया, डॉ. नितीन कर्णिक, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. केदार तोरस्कर, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित यांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा अहवाल १६ एप्रिल २०२० च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २९७ कंटेन्मेंट झोन सक्रिय असून आज एकूण ५६६४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून, त्यांनी २०.५० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील पुढील प्रमाणे असून कंसात मृत्यू ची संख्या नोंदविण्यात आली आहे.
मुंबई महापालिका: २०७३ (११७ मृत्यू), ठाणे: १३, ठाणे महापालिका: १०९ (३), नवी मुंबई मनपा: ६८ (३), कल्याण-डोंबिवली मनपा: ५० (२), उल्हासनगर मनपा: १, भिवंडी निजामपूर मनपा: १, मीरा-भाईंदर मनपा: ५१ (२), पालघर: ५ (१), वसई-विरार मनपा: ३४ (३), रायगड: ६, पनवेल मनपा: १२ (१), ठाणे मंडळ एकूण: २४२३ (१३२), नाशिक: ३, नाशिक मनपा: ५, मालेगाव मनपा: ४० (२), अहमदनगर: १९ (१), अहमदनगर मनपा: ९, धुळे: १ (१), धुळे मनपा: ०, जळगाव: ०, जळगाव मनपा: २ (१), नंदूरबार: ०, नाशिक मंडळ एकूण: ७९ (५), पुणे: १६, पुणे मनपा: ४१९ (४४), पिंपरी चिंचवड मनपा: ३८ (१), सोलापूर: ०, सोलापूर मनपा: १२ (१), सातारा: ७ (२), पुणे मंडळ एकूण: ४९२ (४८), कोल्हापूर: ३, कोल्हापूर मनपा: ३, सांगली: २६, सांगली- मिरज- कुपवाड मनपा:०, सिंधुदुर्ग: १, रत्नागिरी: ६ (१), कोल्हापूर मंडळ एकूण: ३९ (१), औरंगाबाद: ०, औरंगाबाद मनपा: २८ (२), जालना: २, हिंगोली: १, परभणी: ०, परभणी मनपा: १, औरंगाबाद मंडळ एकूण: ३२ (२), लातूर: ८, लातूर मनपा: ०, उस्मानाबाद: ३, बीड: १, नांदेड: ०, नांदेड मनपा: ०, लातूर मंडळ एकूण: १२, अकोला: ७ (१), अकोला मनपा: ७, अमरावती: ०, अमरावती मनपा: ५ (१), यवतमाळ: १३, बुलढाणा: २१ (१), वाशिम: १, अकोला मंडळ एकूण: ५४ (३) , नागपूर: १, नागपूर मनपा: ५५ (१), वर्धा: ०, भंडारा: ०, गोंदिया: १, चंद्रपूर: ० ,चंद्रपूर मनपा: ३, गडचिरोली: ०, नागपूर मंडळ एकूण: ६० (१)
इतर राज्ये: ११ (२) एकूण: ३२०२ (१९४)