#CoronaVirusUpdate : राज्यात आज ३५० नवीन रुग्ण , २५९ रुग्ण उपचारानंतर घरी तर १७८ मृत्यू

राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता २६८४ झाली असून राज्यात आज कोरोनाच्या ३५० नवीन रुग्णांची नोंद झाली. करोनाबाधीत २५९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या राज्यात २२४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४६ हजार ५८८ नमुन्यांपैकी ४२ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २६८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६७ हजार ७०१ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ५,६४७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ५० जण करोनाबाधीत आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलडाणा जिल्ह्यात ६, मुंबईत १४ तर प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीममधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोनाबाधीत आढळले आहेत.
राज्यात आज १८ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ११, पुण्यातील ४ तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ७ महिला आहेत. त्यातील ५ जण हे ६० वर्षांवरील आहेत ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १३ रुग्णांमध्ये ( ७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कर्करोग तर एकाला क्षयरोग होता.