#CoronaVirusUpdate : आरोग्य विभागाच्या कोरोना व्हायरसच्या चार्टमधून ‘तबलीगी जमात’चा कॉलम हटविण्याचे निर्देश…

देशात चालू असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या चर्चेनंतर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील निझामुद्दीन भागात ‘तबलीघी जमात’ मरकझ प्रकरण समोर आल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचा उल्लेखही आरोग्य मंत्रालयाने आपल्या पत्रकार परिषदेत वारंवार केल्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आणि ‘तबलीघी’ जमात टीकेचा केंद्रबिंदू बनली. याशिवाय केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारकडून वारंवार ‘तबलीगी जमात’शी निगडीत रुग्णांची संख्या जाहीर केली जात आहे. मात्र, आता अल्पसंख्यांक आयोगाने दिल्लीच्या आरोग्य विभागाला कोरोना व्हायरसच्या चार्टमधून ‘तबलीगी जमात’चा कॉलम हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतात आत्तापर्यंतआढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५८६५ वर पोहचलीय तर कोरोनामुळे १६९ नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र, सुदैवानं जवळपास ४७८ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, मरकझ प्रकरणामुळे देशातील करोनाबाधितांची संख्या वाढली. मार्च महिन्यात दिल्लीच्या निझामुद्दीन भागात ‘तबलीघी जमात’च्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या अनेक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. मरकझमधूनही अनेकांना बाहेर काढण्यात आलं आणि दिल्लीतल्या वेगवेगळ्या रुग्णालयांत क्वारंटाईन करण्यात आलं. याशिवाय वेगवेगळ्या राज्यांत दाखल झालेल्या या ‘तबलीघी जमातीच्या’ कार्यकर्त्यांचा शोध सरकारकडून सुरू आहे.
दरम्यान दिल्ली सरकारनं लॉकडाऊन घोषित केल्यानंतरही अनेक तबलीघी जमातचे लोक मरकझमध्ये मोठ्या संख्येनं आणि कोणत्याही सुरक्षेशिवाय उपस्थित असल्याचं आढळलं होतं. यामध्ये अनेक भारतीय आणि परदेशी नागरिकांचा समावेश होता. कार्यक्रमानंतर हे लोक वेगवेगळ्या राज्यांतील आपापल्या ठिकाणांवर निघून गेले. त्यातील अनेक जण करोनाबाधित असल्याचं आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनाही धोका निर्माण झाला असल्याने प्रत्येक राज्याची सरकारे या लोकांच्या शोधासाठी प्रयत्न करीत आहेत.