#CoronaVirusEffect : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी बंद , प्रवास टाळाच …

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून राज्य शासन अनेक उपाययोजना करीत असून त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईहून पुण्याला जाणारा एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. ३१ मार्च पर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन प्रशासनानं आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ तर देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२७ वर पोहोचली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. रविवारी संध्याकाळी महाराष्ट्रात अचानक १५ जणांचा टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहिती नुसार १५ ते २० रुग्णांना संसर्गातून कोरोना झाला आहे. त्यामुळे हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही अनेक ठिकाणी गांभीर्यानं न घेणाऱ्यांसाठी आता थेट प्रशासन थेट कारवाई करणार आहे. तसे राज्य सरकारला केंद्राकडून निर्देशही देण्यात आले आहेत. मुंबई-पुण्यात अनेक नागरिकांची कामानिमित्तानं ये-जा सुरू असते. हा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी एक्स्प्रेस वेवरची वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे. ज्यांचं घर पुण्यात आहे आणि मुंबईहून पुण्याला जात आहेत अशा नागरिकांना फक्त पोलीस एक्स्प्रेस वे वरून सोडत आहेत. ज्यांचं घर मुंबईत आहे ते पुण्यावरून येत असतील तर अशा नागरिकांनाही जाण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र प्रवास किंवा टूर किंवा कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना एक्स्प्रेस वेवरून जाण्यासाठी बंद घातली आहे. पुण्याहून येणारे नागरिक मुंबईत घर असेल तर येऊ शकतात.
दोन्ही प्रवेश द्वारावर बॅरेकेट्स लावून एक्सप्रेस वे बंद करण्यात आला आहे. तसेच दोन्ही ठिकाणी पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. मुंबई-पुण्यात लोकांनी ये-जा करू नये आणि ह्या व्हायरसचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.