चर्चेतली बातमी : सोनभद्राच्या दोन पहाडांवरील खाणीत सोने नेमके आहे तरी किती ?

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे सापडलेल्या सोन्याच्या खाणींमुळे सध्या सोनभद्र चांगलेच चर्चेत आले आहे. पण खाणीत ३००० टन नव्हे तर फक्त १६० किलो सोने आहे, असा दावा भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) केला आहे. ‘सोनभद्रच्या खाणीत ३ हजार टन सोनं असण्यावर जीएसआयचा विश्वास नाही. सोनभद्रमध्ये ५२८०६.२५ टन अशुद्ध सोनं आहे. यातील प्रत्येक टनातून ३.०३ ग्रॅम शुद्ध सोनं मिळेल. यानुसार संपूर्ण खाणीतून फक्त १६० किलो सोनं मिळू शकेल’, असा दावा जीएसआयचे संचालक डॉ. जीए. एस. तिवारी यांनी केला असल्याने वस्तुस्थिती समोर आली आहे.
उपल्बध माहितीनुसार सोनभद्रमध्ये सोन्याचा शोध अजून सुरू आहे. जीएसआयचा सर्व्हे अजूनही सुरू आहे. तिथे आणखी सोनं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या जे अशुद्ध सोने आढळले आहे त्यातून ३००० टन नव्हे तर फक्त १६० किलो शुद्ध सोन निघेल असा अधिकृत खुलासा करण्यात आला आहे. युएनएफसी मानक असलेल्या जी-३ पातळीवरील तपासाचा अहवाल जीएसआयने उत्तर प्रदेश भूविज्ञान व खाण संचालनालयाला पाठवला आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली. सोनभद्रच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भूमी संबंधी अहवाल मागवण्यात आला आहे. यानंतर ह्या भागावर भू-राजस्व मानचित्र अंकित करून उत्खननासाठी उपयुक्त क्षेत्र असल्याची औपचारिकता पूर्ण केली जाईल. त्यानंतर लिलाव केला जाईल, असं तिवाही म्हणाले. सोनभद्र जिल्ह्यातील सोन आणि हरदी या दोन पहाडात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत.