शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना आणि माँ जिजाऊंना अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि माँ जिजाऊंना अभिवादन केले . या अभिवादन सोहळ्यानंतर त्यांनी उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. अजितदादा यांना उद्धेशून आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले कि , इतके वर्ष आपण उगाच दूर होतो. आता आपण सर्व एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालावली असे वाटत आहे. आता आम्ही एकत्र आलो असून जे काही करून दाखवायचे आहे ते दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं वचन मी तुम्हाला देतो. महाविकास आघाडीचं सरकार हे माझं सरकार आहे. हे आपलं सरकार आहे. ही भावना गोरगरीब आणि सर्व सामान्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असंही त्यांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात शिवनेरी किल्ल्यावर पार पडला. यावेळी उपस्थित शिवप्रेमींना मुख्यमंत्री संबोधित करत होते. यावेळी उपस्थितांपैकी एका शिवप्रेमीने ‘शिवस्मारकाचे लवकर बघा…’ असा आवज दिला. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “सगळं बघतो. आता लोकांचे सरकार आलेले आहे. त्यामुळे काळजी करु नका. शिवस्मारका सोबतच शिवनेरीचा विकास करण्याकडेही आम्ही लक्ष देऊन”, असे ते म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्याचा कायापालट आणि सुशोभिकरण करण्यासाठी २३ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. शिवनेरीवरील गर्दी पाहता राज्यात खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य आलंय हे स्पष्ट होतंय, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं. कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येईल, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी एल्गार परिषदप्रकरणावरून मुख्यमंत्र्यांशी कोणतेही मतभेद नसल्याचंही स्पष्ट केलं.