Nagpur Accident : वऱ्हाडी बसला अपघात ७ ठार तर टेम्पोच्या धडकेने २ वारकरी ठार

नागपूर येथे वऱ्हाडाची बस कंटेनरला धडकल्याने ७ जणांचा तर अकोला येथे टेम्पोच्या धडकेत २ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. आज पहाटे नागपूर-भंडारा महामार्गावर लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या एका बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्वजण नागपूरच्या गांधीबाग पोलीस क्वार्टरमधील रहिवासी असल्याचं सांगण्यात येतं. या बस मध्ये ३० प्रवासी होते असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने बसच्या काचांचा चक्काचूर झाला. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर काचांचा खच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या अपघातामुळे नागपूर-भंडारा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.
आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत शिंगोरी गावाजवळ ही घटना घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड भंडारावरून नागपूरला परतत होते. हा अपघात इतका भीषण होता की समोरच्या बाजूने बसचा संपूर्ण चुरा झाला आहे. हा अपघात घडताच स्थानिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अद्याप मृतांची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.