चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारला भीषण अपघात, डोळ्यादेखत अख्खे कुटुंब संपले….

काल मध्यरात्रीच्या सुमारास कोपरगाव तालुक्यात चालकाचे नियंणत्र सुटल्याने झालेल्या अपघातात त्याचा मुलगा, मुलगी आणि पत्नी जागीच ठार झाली आहे. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत सोनार वस्ती फाट्यानजीक मध्यरात्रीच्या सुमारास कळवण नाशिक येथील होंडा कार (क्रं.एम.एच.१५ बी.एक्स.५१४५) कोळपेवाडीकडून कोपरगावकडे जात होती. कार भरधाव वेगात येत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार लिंबाच्या झाडावर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
या भीषण अपघातात कार चालक रवींद्र अशोक वानले (वय-३५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नी, मुलगा साई वानले,मुलगी जानू वानले (वय-४) हे तिघे उपचारा दरम्यान ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर होऊन तिने पेट घेतला. यामध्ये कारचा काही भाग जळून खाक झाला आहे.
अपघातग्रस्तांचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान या नातेवाईकांना दुर्घटनाग्रस्त वानले कुटुंब कोठे जात होते याची कोणतीही माहिती नव्हती. चालक हे काहीतरी तणावात असावे असा कयास व्यक्त होत आहे. मात्र ते मद्यधुंद मात्र नव्हते असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. याबाबत धारणगाव येथील पोलीस पाटील यांचे पती निळू तात्याबा रणशूर यांनी याबाबत चालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.