चर्चेतली बातमी : पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान , मंत्री नवाब मलिक यांचीही वादात उडी

पाथरी हेच साई बाबा यांचं जन्मस्थळ आहे, त्यामुळे पाथरीचा विकास जन्मस्थळ म्हणून व्हावा, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी घेतली असल्याने साईबाबा जन्मस्थळावरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांच्या म्हणण्यानुसार ,’राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात पाथरीला जन्मस्थळ म्हणून निधी द्यावा अशा सूचना केल्या होत्या. राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च प्रमुख आहेत. त्यांच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे. पाथरीचा विकास साई जन्मस्थळच्या दृष्टीने व्हावा,’ अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिर्डीचे ग्रामस्थ आक्रम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थळ असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर शिर्डीतील ग्रामस्थांनी बंदची हाक दिली होती. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिर्डीतील ग्रामस्थांचं शिष्टमंडळ यांची मुंबईत बैठक झाली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी झाली आणि शिर्डीतील ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. आमचा पर्यटन स्थळ म्हणून पाथरीच्या विकासाला विरोध नाही मात्र साईबाबांचा जन्म पाथरीत झाला असे म्हणण्यास आमचा विरोध असल्याचे शिर्डीकरांचे म्हणणे आहे.