आनंदराज आंबेडकरांनीही वंचित बहुजन आघाडीचे नाते तोडले , सर्व बहुजन संघटनांना एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन सेना करणार प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीमध्ये आपण कधीच नव्हतो , लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फक्त आपण त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता , मात्र या दोन्हीही निवडणुकीत आलेल्या अपयशाने आंबेडकरी समाजात नैराश्य आले आहे याची दाखल घेऊन आपण वंचित बहुजन आघाडीसोबतचा आपला पाठिंबा काढून घेत असल्याची भूमिका रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आनंदराज आंबेडकर औरंगाबादेत आले होते.
पत्रकारांशी बोलताना आनंदराज म्हणाले कि , राज्यभरात वेगवेगळ्या बहुजन संघटनांना एकाच छताखाली एकत्र आणण्याचे काम आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून करत आहोत. नवीन कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून आंबेडकरी समाजाला योग्य दिशा देण्याचा आणि सत्तेत घेऊन जाण्याचा निश्चय आम्ही केला आहे.
वंचित बहुजन विकास आघाडीला आम्ही कोणत्याही अटीशर्थीविना पाठिंबा दिला होता. ‘वंचित’साठी आम्ही प्रचंड काम केलं, मेहनत घेतली. पण, अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य निर्माण झालं आहे. त्यामुळे समाज हा सैरभैर झाला आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाला एकत्र ठेवण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यामुळे रिपब्लिकन सेना ही आंबेडकरी समाजाची प्रमुख संघटना म्हणून दिसेल, असा विश्वास आनंदराज यांनी व्यक्त केला.