वादग्रस्त ” आज के शिवाजी – नरेंद्र मोदी ” पुस्तक भाजपकडून मागे घेण्याच्या भाजपच्या प्रकाशकाला सूचना

दिल्लीतील भाजप नेत्याने प्रसिद्ध केलेल्या ‘आजके शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकाला होत असलेला विरोध लक्षात घेऊन भाजपने सावध पवित्रा घेतला असून. या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात येणार असल्याचे भाजपचे नेते श्याम जाजू यांनी सांगितले आहे. प्रकाशकांना हे पुस्तक मागे घेण्यास सांगण्यात आल्याची माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावरून भाजपवर कठोर शब्दात टीका केली असून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये या विषयावरून तीव्र प्रतिसाद उमटत आहेत.
या वादग्रस्त विषयावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विविध पक्षांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले आहे कि , जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना होऊच शकत नाही. नरेंद्र मोदी सुद्धा अशी तुलना करणार नाहीत. मात्र विरोधक राईचा पर्वत करत आहेत असा आरोपही त्यांनी आहे. यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुनगंटीवार पुढे म्हणाले कि , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी जाणता राजा असे विशेषण सर्रास वापरले जाते. हे विशेषण शिवाजी महाराजांसाठी वापरले जाते . असे असताना पवारांसाठी जेव्हा हे विशेषण वापरले जाते तेव्हा विरोधकांना ते चालतं का ? असा सवाल त्यांनी केला. बांगलादेश युद्धानंतर इंदिरा गांधी यांनी दुर्गेची उपमा देण्यात आली होती, “इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा ” असं म्हटलं गेलं होतं. याचा अर्थ इंदिरा गांधी या काही दुर्गेचा अवतार होत नाहीत. तर केवळ विशेषण म्हणून सांकेतिक अर्थाने त्याचा वापर केला जातो याचं तारतम्य विरोधकांनी हरवलं आहे असंही ते म्हणाले.
दरम्यान शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. भाजपाच्या खोडसाळपणाचा समाचार घेताना थोरात पुढे म्हणाले की, व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी सीएए आणि एनआरसीच्या माध्यमातून देशाला वेठीस धरणारे, धार्मिक तेढ निर्माण होईल अशा भूमिका घेणारे, नोटबंदीच्या माध्यमातून सामान्य जनतेला वेठीस धरणारे आणि महत्वाचे म्हणजे हुकूमशाही पद्धतीने कारभार करू इच्छिणाऱ्या नरेंद्र मोदींची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ शकत नाही. असंही ते म्हणाले. कोल्हापूरात युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतळ्याचे बिंदू चौकात दहन करण्यात आले. भाजपकडून समाजात तेढ निर्माण सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा भाजपला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा युवक काँग्रेसने दिला.