काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीच नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दंगली घडविल्या , शहा यांचा गंभीर आरोप

भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करीत राहुल आणि प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करून दंगली घडवल्या असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधींवर टीका केली. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनाला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप शहा यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जनतेची दिशाभूल केली आणि दंगली घडवून आणण्याचे काम केले. १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल झाली. समाजातील अनेक लोकांच्या हत्या झाल्या. काँग्रेसच्या सरकारनं पीडितांना दिलासाही दिला नाही. मोदी सरकारनं प्रत्येक पीडित व्यक्तीला पाच-पाच लाख रुपये नुकसान भरपाई दिली. जे दोषी होते, त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले, असेही शहा म्हणाले.
अमित शहा यांनी पाकिस्तानमधील ननकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याच्या घटनेवरूनही विरोधकांवर निशाणा साधला. केजरीवाल, राहुल आणि सोनिया गांधी यांनी डोळे उघडे ठेवून बघावे . पाकिस्तानने
ननकाना साहिबसारख्या पवित्र स्थळावर हल्ला करून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. राम जन्मभूमीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी टीका केली. काँग्रेसने राम जन्मभूमीचे प्रकरण खूप वर्षे रखडून ठेवले. त्यांनी कोर्टातही विरोध केला. आता कोर्टानंही निर्णय दिला आहे. देशातील कोट्यवधी लोकांच्या इच्छेनुसार राम जन्मस्थळावर मंदिर उभारलं जाईल, असं शहा यांनी सांगितले.
दिल्ली सरकारवरही शहा यांनी तोफ डागली. केजरीवाल यांनी दिल्लीसाठी काय केलं ते सांगावं. २० महाविद्यालये सुरू करण्यात येतील असे सांगितले होते, कुठे गेली महाविद्यालये? पाच हजारांहून अधिक शाळा उभारण्याचे आश्वासन दिले होते . चश्मा लावूनही शाळा दिसल्या नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.