हैद्राबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना देण्यात आलेल्या जेवणावरून संतप्त प्रतिक्रिया

हैदराबाद येथील बलात्कार आणि खून प्रकरणावर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त होत असतानाच या प्रकरणातील नराधमांना तुरुंगात मात्र खाण्यासाठी मटन करी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नियमानुसारच या आरोपींना जेवण दिल्याचा खुलासा करण्यात येत असला तरी या नराधमांना मटन करी देण्याची गरज काय होती? असा सवाल विचारला जात आहे. या प्रश्नावरून राज्यसभेत तीव्र पडसाद उमटले . यावेळी बोलताना गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी अशा प्रकरणात कायदा अधिक कडक करण्याची गरज प्रतिपादन केली.
हैदराबादेत घडलेल्या या अमानुष बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबादच्या चेरापल्ली येथील हाय सेक्युरिटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या चारही आरोपींना दुपारच्या जेवणात दाळ-भात देण्यात आला. रात्रीच्यावेळी मात्र त्यांना मटन करी देण्यात आली. यावर जेंव्हा प्रश्न उपस्थित झाला तेंव्हा जेल मॅन्युअलनुसारच या आरोपींना जेवण देण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे . मात्र मानवतेला काळीमा फासणारं कृत्य करणाऱ्या नराधमांना तुरुंग प्रशासनाने मटन करी दिलीच कशी? हे आरोपी मोठी कर्तबगारी बजावून तुरुंगात आले होते काय? असा संतप्त सवाल देशभरातून विचारला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचे आज राज्यसभेत तीव्र पडसाद उमटले. समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी तर या नराधमांना जनतेच्या हवाली करा, अशी संतप्त मागणी केली. तर दोषींना फाशी देण्यासाठी कायदा आणखी कडक करायला हवा, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं.
अशा प्रकारच्या अमानुष घटना कायद्याद्वारे नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीद्वारे निकाली काढल्या जाऊ शकतात. बलात्कारासारख्या पाशवी कृत्यांना आळा घालण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीद्वारेच काहीतरी ठोस उपाय केला जाऊ शकतो. आता तर अशा घटनांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने निकाल लवकर लागतो, पण आरोपी अपीलांवर अपील करून स्वत:चा बचाव करतात. अशा नराधमांवर दया दाखवायची का? अशा लोकांची दया याचिका केंद्र सरकार, गृहमंत्रालय, राष्ट्रपतींकडे पाठवण्याची व्यवस्था का आहे?’, असा प्रश्न राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित केला.