महाराष्ट्राचे राजकारण : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीवर काँग्रेसने उपस्थित केले १० प्रश्न … सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सकाळी सुनावणी

अचानक कोणलाही माहिती न देता राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या महानाट्यावरून काँग्रेसने १० प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व प्रकरणात भाजपने विश्वासघात केला असल्याच्या आरोप करताना काँग्रेसने अनेक आक्षेप नोंदवले आहेत. महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेबद्दल आणि त्यासाठी केलेल्या घाईबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सेना -काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून यावर तत्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी केली असता उद्या सकाळी ११.३० वाजता त्यावर सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. या याचिकेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्ष एकमेकांच्या सोबत आहेत. हि याचिका लवकर निकालात काढून २४ तासात विश्वासदर्शक ठराव घ्यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
आज दुपारी एका पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 10 प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची उत्तरे भाजपकडून अद्यापही कोणीही दिली नाहीत सत्तेचा दावा करण्यापासून ते शपथविधीपर्यंतचे कार्यक्रम कसे पार पडले? त्यासाठीची औपचारिकता पार पाडली का, असे सवाल काँग्रेसने विचारले आहेत.
घटनाबाह्य गोष्टी घडल्या असल्याची शक्यता वर्तवताना काँग्रेसचे प्रवक्त्यांनी भाजप प्रणित सरकारवर आरोप केले.
१. सत्तास्थापनेचा दावा नेमका कुणी केला आणि कधी केला?
२. दाव्याच्या वेळी राज्यपालांना सादर केलेल्या पत्रावर किती आमदारांच्या सह्या होत्या?
३. बहुमताचा दावा करताना जे आमदारांच्या सहीचं पत्र राज्यपालांना सोपवण्यात आलं त्यातल्या सह्या प्रमाणित केल्या गेल्या का?
४. राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी कॅबिनेटने राष्ट्रपतींकडे शिफारस केली का आणि कधी?
५. महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी कॅबिनेटची बैठक कधी झाली?
६. राष्ट्रपतींनी या शिफारसीचा स्वीकार करून आदेश कधी काढले?
७. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना कुठल्या पत्रव्यवहाराद्वारे शपथविधीसाठी निमंत्रित केलं?
८. शपथविधीचा कार्यक्रम गुपचूप का उरकला? नेहमीच्या प्रथेप्रमाणे अन्य राजकीय पक्ष, मुख्य न्यायाधीश आदींन निमंत्रित का नाही केलं?
९. बहुमत सिद्ध करण्यासाठीची मुदत राज्यपालांनी अद्याप औपचारिकपणे का जाहीर केलेली नाही?
१०. राष्ट्रपती राजवट रद्द करण्याची शिफारस राज्यपालांनी रात्री किती वाजता पाठवली?