Politics of Maharashtra : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर कोण काय म्हणाले ? देवेंद्र अफडणवीस अजूनही आशावादी

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून असून माजी मुख्यमंत्री व भाजप विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी, असल्याचे म्हटले आहे. राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी आशाही फडणवीस यांनी व्यक्त केली.
देवेंद्र अफडणवीस अजूनही आशावादी…
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्यात गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल. सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, अशी आपण अपेक्षा करतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हटले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेवर पुन्हा ठपका..
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रपती राजवटीवरून शिवसेनेवर नामोल्लेख न करता हल्ला चढवला. जनादेश स्पष्ट असताना लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं ही भाजपची भूमिका होती. अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, जनहिताचं काम करण्यासाठी सरकार स्थापन होणं गरजेचं होतं. मात्र सर्वात मोठा पक्ष भाजप असताना आणि मतदारांनी तसा जनादेश दिलेला असताना मित्र पक्षाने जनादेशाचा अनादर केला. इतर पर्याय असल्याचं सांगून मित्रपक्षाने राज्यात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती ओढवली. काही लोकांनी जो हट्ट केला, त्याचा हा परिणाम आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
नारायण राणे पुन्हा मैदानात
आपल्याला सत्ता स्थापन करायची आहे, कामाला लागा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं असून सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आहे, असं सांगतानाच मी भाजपमध्ये आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यासाठी मला जे काही करता येईल ते करेल, असं भाजप नेते नारायण राणे यांनी स्पष्ट करून खळबळ उडवून दिली.
यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले. आता शिवसेना भाजपने पुन्हा आमच्याशी संपर्क साधल्याचे सांगत आहे. आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेनेकडून अशी वक्तव्ये होत आहेत. उद्धव ठाकरे आम्हाला शेतकऱ्यांची आणि जनतेची काळजी आहे, असे सांगतात. मात्र, ते सरकार स्थापन करायला तयार नाहीत. त्यामुळे आता भाजप १४५ आमदारांची यादी घेऊनच राज्यपालांकडे जाईल, शिवसेनेप्रमाणे खाली हाताने राजभवनात जाऊन बसणार नाही. काँग्रेस शिवसेनेला उल्लू बनवत आहे. ही गोष्ट उद्धव ठाकरे यांना कळायला हवी, असंही ते म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सत्ता स्थापन करायची आहे, कामाला लागा, असे आदेश दिल्याचं भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते नारायण राणेंचं व्यक्तिगत मत आहे, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
…हा तर महाराष्ट्राचा घोर अपमान : राज ठाकरे
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणे हा महाराष्ट्राचा घोर अपमान असून हा नतद्रष्टांचा खेळखंडोबा आहे, अशा तिखट शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. राज्यात सुरू असलेल्या सत्तापेचावर राज यांनी पहिल्यांदाच मौन सोडत शिवसेना-भाजपवर टीका केली आहे.
#PresidentRuleInMaha राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे.
राज ठाकरे
— Raj Thackeray (@RajThackeray) November 12, 2019
निवडणूक निकालानंतरही सत्तापेच न सुटल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्राला शिफारस केली. केंद्राच्या शिफारसीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या अध्यादेशावर सही केली. त्यावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी सत्तेचे दावेदार असलेल्या सर्व पक्षांना खास ठाकरी शैलीत फटकारले आहे.