Ayodhya verdict : कोण काय म्हणाले ? जय – पराजयच्या दृष्टीने या निकालाकडे पाहू नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी

बहुचर्चित रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालाचे स्वागत करून ‘देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या खटल्यावर आपला निकाल दिला आहे. या निकालाकडे कुणाचा जय किंवा पराजय या दृष्टीने पाहू नये, तसेच शांतता, सद्भावना आणि एकता कायम राखाण्याचे आवाहन केले.
गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालाचे स्वागत केले, “ देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निकालाकडे जय-पराजय या दृष्टीने पाहायला नको. रामभक्ती असो किंवा रहीमभक्ती, हा क्षण आपल्या सर्वांसाठी राष्ट्रभक्तीच्या (देशभक्ती) भावनेला सशक्त करण्याचा आहे. शांतता, सद्भावना आणि एकता कायम राखण्याचे आवाहन मी देशवासियांना करतो ” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे. एखादा वाद सोडवण्यात कायदेशीर प्रकियेचे पालन किती महत्वाचे आहे हे यातून दिसते. प्रत्येक पक्षकाराला आपापली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी देण्यात आली. न्यायमंदिराने दशकांपासूनचे प्रकरण सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवले आहे ” अशी टिप्पणीही त्यांनी केली.
या निकालामुले न्यायप्रक्रियेवरील सर्वसामान्यांचा विश्वास आणखी मजबूत होणार आहे. आपल्या देशाच्या हजारो वर्षे जुन्या बंधुभावाच्या भावनेनुसार १३० कोटी भारतीयांना शांतता आणि संयमाची ओळख करून द्यायची आहे, असेही मोदी म्हणाले. याआधी त्यांनी अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले होटे. गेल्या काही महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर निरंतर सुनावणी होत होती. या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चांगली गोष्ट होती. कोर्टाच्या निर्णयानंतरही आपल्याला शांतता कायम राखायची आहे.