Maharashtra : मुंबईतील सत्ता संघर्ष लक्षात घेता शरद पवारांनी दौरा अर्धवट सोडून गाठली मुंबई !!

सत्ता स्थापन करणारे दावेदार भाजप आणि शिवसेना यांच्या गोटात काल दिवसभर शांतता असल्याने काहीही घडू शकले नाही. त्यामुळे जबाबदार राजकारणी म्हणून शरद पवार आपला दौरा अर्धवट सोडून रात्री उशिरा मुंबईत परतले आहेत .
‘महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे आणि आम्ही त्याचा सन्मान राखणार आहोत’, असे स्पष्ट करून चार दिवसांच्या शेतकरी संवाद दौऱ्यावर निघून गेले होते परंतु पवार यांनी हा दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. कराड येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर तिथून पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले . भाजप-शिवसेनेत शिगेला पोहचलेले सत्तासंघर्ष आणि नवं सरकार स्थापन करण्यासाठी काही तासांचाच उरलेला अवधी, ही स्थिती लक्षात घेऊन पवारांनी राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईत परतण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
खरे तर शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील सत्तेच्या पेचावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘भाजपा-शिवसेना या दोघांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे. जनतेने काँग्रेस आघाडीला विरोधी बाकावर बसण्याची सुसंधी दिली आहे. त्यामुळे ते काम समर्थपणे पार पाडण्याची आमची भूमिका आहे’, असे पवार या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. या पत्रकार परिषदेत राज्यातील शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अवकाळी पावसाच्या संकटाबाबत पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. या पत्रकार परिषदेनंतर पवार आपल्या चार दिवसांच्या नियोजित दौऱ्यावर निघाले होते.
कोकणात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. प्रामुख्याने भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार होते. पवारांनी आज साताऱ्यातील कराड येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यानंतर तिथून कोकणात जाण्याचं त्यांचं नियोजन होतं. मात्र, दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पुण्यात थोडावेळ थांबून ते रात्री उशिरा मुंबईत परतले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतत असल्याने अनेक तर्क -वितर्क लावले जात आहेत. उद्या शुक्रवारी रात्री १२ वाजता विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. त्यामुळे सत्तेची कोंडी फोडण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल मिळालेल्या भाजपने सत्तास्थापनेचा दावा न केल्यास अनेक नवी समीकरणे जन्माला येण्याची शक्यता आहे. या स्थितीत आपली मुंबईतील उपस्थिती गरजेची आहे, हे ध्यानात घेऊन पवारांनी मुंबईत परतण्याचे ठरवले असावे अशी चर्चा आहे.