भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत फडणवीस यांची विधीमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. हि निवड केल्याबद्दल फडणवीस यांनी सर्व आमदारांचे आणि नेत्यांचे आभार मानले. तसंच महायुतीचा निवडणुकीत विजय झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचेही फडणवीस यांनी आभार मानले.
राज्यात पुन्हा महायुतीचचं सरकार स्थापन होईल. पुढची पाच वर्ष राज्याला स्थिर सरकार देणार आहोत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
लोकांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद याच सरकारमध्ये आहे. यामुळेच जनतेने पुन्हा आपल्याला निवडून दिलंय. राज्यात भक्कम सरकार स्थापन करू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. सत्ता स्थापनेनंतर राहिलेली काम पूर्ण करणार आहेत. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हेच या सरकारचं उद्दीष्ट आहे.
प्रत्येक हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न करणार. गेली पाच वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून काम केलं. आता पुढची पाच वर्षही छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणूनच काम करणार आणि त्यांच्या विचारांचं राज्य असेल. तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेनुसार काम करणार, असं फडणवीस म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावेळी नरेंद्रसिंह तोमर दिल्लीतून भाजपचे निरीक्षक म्हणून आले होते. गेल्या पाच वर्षात एकही गोळीबार झाला नाही, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावाला १० आमदारांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली.