अमित शहा यांना उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला , ‘राज्यात पूर्ण बहुमतानं भाजपचंच सरकार येणार !! ‘ विधानसभा निवडणुका ही केवळ औपचारिकता उरली आहे !!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपरोधिक टोला लगावला आहे . त्याचे कारण ‘राज्यात पूर्ण बहुमतानं भाजपचंच सरकार येणार, हे भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलंच खटकलं आहे. शहांच्या या वक्तव्याचा उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ही केवळ औपचारिकताच उरली आहे. लोकांनी फक्त बटण दाबायचे आहे, दुसरे काय ?,’ असं उद्धव यांनी म्हटलं आहे.
रविवारी मुंबई भाजपच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना शहा यांनी राज्यात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार येईल, असा दावा केला होता. त्यात त्यांनी ‘फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील’, असंही म्हटलं होतं. एकीकडं युतीची चर्चा सुरू असताना शहा यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे .
उद्धव यांनी ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून या मुद्द्यावर तिरकस भाष्य केलं आहे. महाराष्ट्राची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर लढण्याच्या भाजपच्या रणनीतीवरही त्यांनी टीका केली आहे. ‘राष्ट्रीय प्रश्नांची एक नशा असते. त्यापुढं इतर विषय गौण ठरतात. राज्यांच्या प्रश्नांवर नंतर केव्हाही बोलता येईल, असं सध्याचं वातावरण आहे. महाराष्ट्रात आता कोणतेच प्रश्न शिल्लक नाहीत, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. असा आत्मविश्वास याआधी कोणत्याही पक्षानं दाखवला नव्हता. भाजपकडं हा आत्मविश्वास आहे, त्याचा आम्हाला आनंदच आहे,’ असा टोला उद्धव यांनी लगावलाय.
‘फडणवीस यांनी महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांत पुढं नेला आहे, असं प्रमाणपत्र शहा यांनी दिलंय व तेच पुढचे मुख्यमंत्री होतील, असंही जाहीर केलंय. त्यामुळं राज्यातील विधानसभा निवडणुका ही केवळ औपचारिकता उरली आहे. लोकांनी फक्त बटण दाबायचे आहे, दुसरे काय?,’ असं त्यांनी पुढं म्हटलंय.
शिवसेनेच्या या सामानामधील भूमिकेची आज सर्वत्र चर्चा होती. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आम्हालाही युतीची चिंता असून दोन दिवसात काय ती बातमी मिळेल असे म्हटल्याने युतीचा सस्पेन्स चांगलाच वाढला आहे तर सेना कार्यकर्त्यांना मात्र निर्णयाची वाट पाहण्यावाचून पर्याय नाही . भाजप कार्यकर्ते मात्र युती शिवाय निवडणूका घ्याव्यात असा आग्रह धरीत आहेत.