काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर शिक्कामोर्तब , १२५-१२५ आणि मित्र पक्षांना ३८ जागा

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर २८८ जागांपैकी १२५ जागा कॉंग्रेस तर १२५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निवडणूक लढविणार असून उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषेदेत दिली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढविणार आहे. या जागांमधील ५ ते ६ जागा अशा आहेत, ज्या राष्ट्रवादीकडे असून कॉंग्रेस त्या जागांची मागणी करत आहे. तर, ५ ते ६ जागा ज्या कॉंग्रेसकडे आहेत. त्या जागांची मागणी राष्ट्रवादी करत आहे. त्यामुळे सामंजस्याने या जागांची अदलाबदली करण्यात येईल. त्याच प्रमाणे उर्वरीत ३८ जागा मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षांनी ‘महाजनादेशयात्रा,’ ‘शिवस्वराज्य यात्रा’, ‘जनआशिर्वाद’ अशा विविध यात्रांचे आयोजन करून आपले शक्तीप्रदर्शन केले आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याने या पक्षांची युती होणार की नाही, असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीवर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष जर एकत्र लढले असते तर गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता, असे सांगत मागची चूक आता न करता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अघाडीवर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.