राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे यांच्यावर नवाब मलिक यांची कठोर शब्दात टीका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, अशी घणाघाती टीका नवाब मलिक यांनी केली आहे. छत्रपतींच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे यांना परवानगी देण्याचे आमिष भाजपने दाखवले असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव होईल. त्यांना १९९९ च्या पराभवाची त्यांना आठवण करून देऊ. ते कुठल्या पद्धतीने कामे करतात. रात्री व दिवसा कुठल्या अवस्थेत असतात, हे सातारा जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. जरी ते पक्ष सोडून गेले असले तरी ती जागा आम्ही निवडून आणू, असा दावाही त्यांनी केला.
शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे. त्याला जर कोणी धक्का लावत असेल तर जनतेला सोबत घेऊन आम्ही कडाडून विरोध करू, अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली. उदयनराजे भोसले हे १९९९ पूर्वी भाजपचे आमदार व मंत्री होते. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा पराभव केला होता. नंतर ते त्यांच्या मातोश्रींच्या माध्यमातून शरद पवारांना भेटले. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना खासदार केले. त्यांना खासदार केल्यानंतरही ते वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत होते. निवडणुका जवळ आल्या की, ते पुन्हा मातोश्रींच्या माध्यमातून पवारांना भेटायचे. तिकीट मिळवायचे आणि पुन्हा निवडून यायचे, असा टोलाही त्यांनी लगावला.
भारतातील राजे, संस्थानिक यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही माणसे सोडली आहेत. सातारा किंवा अन्य कोणत्याही संस्थानांतील जमिनी कायद्याने विकता येत नाहीत. स्वतःसाठी वापरता येत नाहीत. भाजप सरकार या जागा विकण्याच्या आमिषापोटी राजे, संस्थानिकांना भाजपमध्ये आणत आहे. उदयनराजे हे सुद्धा याच आमिषाने भाजपमध्ये गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी अबाधित राहिल्या पाहिजेत. त्यामुळे उदयनराजे जेव्हा केव्हा ते निवडणूक लढवतील तेव्हा आम्ही त्यांना पराभूत करू, असं ते म्हणाले.