महाराष्ट्र विधानसभा : जागा वाटपावरून भाजप-सेनेत ओढाताण , दोन दिवसात सर्व काही ठीक होण्याची भाजपला आशा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत इच्छूकांची भाऊ गर्दी वाढल्याने तिकीट वाटपाचा तिढा आणखीच वाढला आहे. पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांच्या सोयी लावण्यासाठी दोन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा आपल्यालाच मिळाव्यात म्हणून आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. शिवाय मित्रपक्षांच्याही जागा वाटपाचा मोठा प्रश्न युतीसमोर आहे. येत्या एक-दोन दिवसांत दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत एकमत होण्याची शक्यता भाजप नेत्यांनी वर्तविला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढले होते. भाजपने तेव्हा १२२ जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला १०६ जागा देऊ केल्या आहेत मात्र हा प्रस्ताव शिवसेनेकडून स्वीकारला जाईल अशी शक्यता नाही. त्यामुळे त्यात काही जागांची वाढ करून हा आकडा १२० पर्यंत गेल्यास शिवसेना निश्चितच त्यास तयार होईल, असे सांगितले जात आहे.
युतीतील घटक पक्षांमध्ये असलेले विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला ४ जागा सोडण्याची तयारी दोन्हीही पक्षांनी दाखवली असून या शिवाय रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षासोबत चर्चा सुरू आहे, या तिन्ही पक्षांनी भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अटकळ भाजपने केली असली तरी त्यांनी अशा प्रकारे निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.