सरकारकडून बहुमताचा गैरवापर , काँग्रेसकडून १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान देशभरात आंदोलन : सोनिया गांधी

लोकसभा निवडणुकांमुळे आलेली राजकीय मरगळ दूर करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करून या मुद्द्यावारून मोदी सरकारविरोधात १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान देशभरात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे .
या बैठकीला माजी अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहिले नाहीत. याबाबत माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं. ही बैठक पक्षाचे सरचिटणीस, प्रभारी सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षनेत्यांची होती. त्यामुळे केवळ हेच नेते बैठकीला उपस्थित होते, असे सिंह म्हणाले.
लोकसभेत मिळालेल्या बहुमताचा भाजप ‘अत्यंत धोकादायक’ पद्धतीने गैरफायदा घेत असून डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून सूडाचं राजकारण खेळलं जात असल्याचा आरोपही सोनियांनी केला.
आज काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना सोनिया गांधी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारला जनतेपुढे उघडे पाडण्याची गरज असल्याचे सांगितले. आपला संकल्प आणि संयमाचीच ही परीक्षा असून आता आंदोलनाच्या मार्गाने आपल्याला पुढे जावे लागणार आहे, असे आवाहनही सोनियांनी यावेळी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोदी सरकारमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. हे सरकार जनतेकडून मिळालेल्या बहुमताचा गैरफायदा घेत आहे. सूडाचं राजकारण खेळून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. आर्थिक आघाडीवर जी घसरण होत चालली आहे त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सारं केलं आहे. देशात अभूतपूर्व अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे, असे नमूद करत सोनियांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.