” पुढच्या वर्षी लवकर या…” च्या गजरात राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणूका दुमदुमल्या !!

पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात ढोलताशाचा दणदणाटात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा देत या मिरवणुका निघाल्याने मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नगर, नागपूर, अमरावती, रत्नागिरी, नवी मुंबई, रायगडसह संपूर्ण राज्यातील रस्ते गजबजून गेले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाप्पाच्या आगमनाची लगबगीने तयारी करणारे भाविक मात्र आज बाप्पाला निरोप देताना भावूक झाले होते. सकाळी बाप्पाची मनोभावे पुजा केल्यानंतर पारंपारिक वेषात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकांमध्ये महिला आणि लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
मुंबईतील गणपती विसर्जन सुरळीत व्हावं यासाठी ५० हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसंच पोलीसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, फोर्स वन, रॅपिड अॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे.तर संपूर्ण राज्यभरात २ लाखांच्यावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर सर्वत्र सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येणार आहे.
तब्बल दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात… लेझिमच्या तालात… गुलाल उधळत आज राज्यभरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…’ असा जयघोष करत पाणावलेल्या डोळ्यांनी संपूर्ण राज्यभरात विघ्नहर्त्या गणरायचं विसर्जन सुरू आहे. यावेळी बाप्पाला निरोप देताना भाविक भावूक झाले होते. तर विसर्जन स्थळे, नदी, तलाव आणि चौपाट्यांवर शक्ती आणि भक्तीचा अनोखा संगम बघावयास मिळत आहे. दरम्यान, गिरगावमध्ये विसर्जनादरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये ४१ जण किरकोळ जखमी झाले असून एकजण फ्रॅक्चर झाला आहे.
विसर्जन मिरवणुकांनी अवघी मुंबापुरी दुमदुमून गेली होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईत ९ हजार बाप्पांना निरोप देण्यात आला होता. त्यात ३८३ सार्वजनिक, ८९१८ घरगुती गणपतींसह ६४ गौरींचाही समावेश होता. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लालबागचा राजा चिंचपोकळी पुलावरून मार्गस्थ झाला. यावेळी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या वर्षा या निवास्थानी गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. गणेश विसर्जनावेळी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. मुंबईत तब्बल ५० हजार पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. या विसर्जन मिरवणुकांवर ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला होता. दरम्यान, गिरगाव चौपाटीवर विसर्जनावेळी झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ४१ जण किरकोळ जखमी झाले. तर एकजण फ्रॅक्चर झाला.