ओम आणि गाय शब्द ऐकताच काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो : मोदी

मथुरेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षेच्या मुद्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला. “या देशात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की, ओम आणि गाय हे शब्द कानावर पडले तर काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यांना देश पुन्हा १६व्या शतकात गेल्यासारख वाटतं. अस ज्ञान सांगणाऱ्यांनी देशाला बर्बाद केल आहे आहे”, अशी टीका मोदी यांनी विरोधकांवर केली.
दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरेचा दौरा केला. मोदी यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजनासह शेतकऱ्यांसाठीच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजनेची घोषणा करत प्लास्टिक मुक्त भारतासह ‘जय किसान’चा नारा दिला.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले, “लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पहिल्यांदाच कृष्णाच्या नगरीत येण्याचे भाग्य मिळाले आहे. जनादेश मिळाल्यानंतर सरकारने तुमच्या अपेक्षेप्रमाणेच अभूतपूर्व काम करून दाखवले आहे. देशाच्या विकासासाठी तुमचे समर्थन सदैव मिळत राहिल. आज संपूर्ण विश्व पर्यावरण संरक्षणासाठी रोल मॉडलचा शोध घेत आहे. पण, भारताकडे भगवान श्रीकृष्णासारखा प्रेरणास्त्रोत आहे. ज्यांच्याशिवाय पर्यावरण प्रेमाची कल्पनाच अपूर्ण आहे”, असे मोदी म्हणाले.