उद्धव ठाकरे यांनी मारला ” मौके पे चौका !!” महायुतीवर मोदींसमोरच केले शिक्कामोर्तब !!

राज्यात युतीचेच सरकार येणार आहे, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मेट्रो विस्ताराच्या शुभारंभावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच युतीवर शिक्कामोर्तब केलं.
मुंबईत आज मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरेही उपस्थित होते. राज्यात युतीचेच सरकार येणार आहे, असा विश्वास उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला. आम्हाला सत्तेची हाव नाही. राज्याचा विकास करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, असं स्पष्ट करतानाच एक चांगलं आणि मजबूत सरकार राज्यात येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याबद्दल उद्धव यांनी मोदींचे आभार मानले. अयोध्येत तुम्ही राम मंदिर बांधाल आणि समान नागरी कायदाही तुम्ही कराल असा आम्हाला विश्वास आहे, असं ते म्हणाले. मोदींच्या रुपाने देशाला समर्थ नेतृत्व मिळालं आहे. मोदींनी चंद्रालाही गवसणी घातली आहे, अशा शब्दांत उद्धव यांनी कौतुक केले.